18.10.12

पार्वती



ती पर्वतराज हिमालयाची कन्या. भगवान शंकरांची पत्नी. गणेश आणि कार्तिकेय या महापराक्रमी पुत्रांची माता, आणि ज्या दुर्गारूपाचं अधिष्ठान नवरात्राच्या नऊ दिवसांत तुम्ही आम्ही मांडतो, त्या दुर्गारूपाची मुळप्रकृती म्हणुन पार्वतीचा उल्लेख नवरूपांमध्ये महत्त्वाचा ठरतो. भगवान  शंकरांशी विवाह झाल्यामुळे पार्वती म्हणजे त्यांच्या आधिच्या पत्नीचा, म्हणजे सतीचा दुसरा जन्म  असल्याचं आपण परंपरेने मानतो.

मात्र हिमालय पर्वतांच्या रांगात वसलेल्या कुठल्याश्या एका नगराच्या प्रमुखाची एक साधारण मुलगी म्हणुन तीचा विचार करणे सुरू केल्यास पार्वतीने केलेल्या अग्नीदिव्यांचा खरा परिचय आपल्याला येइल.

कैलासाच्या अत्यंत दुर्गम शिखरावर वास्तव्याला असणा-या शिवाशी विवाह करायचा ध्यास तीने घेतलेला. या परिस्थीतीत राहणे म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. महिनोनमहिने बर्फाच्छादितच राहणा-या या प्रदेशात किती दिवस उपास पडतील याचा नेम नाही. म्हणुन तीने व्रत करून उपास-तापासाची सवय केली. उन-पाऊस-बर्फवृष्टी यांची पर्वा न करता ती अरण्यांमध्ये तप करत राहिली, ते यासाठीच.

शिवाशी विवाह झाल्यानंतर तीने पत्नी होण्याचा एक आदर्शच जगापुढे ठेवला. शिव-पार्वती संवाद, त्यांचे चौसर खेळणे, आकाशभ्रमणाला बरोबर जाणे, एकमेकांना वेगवेगळ्या पद्धतीने रिझवीणे, त्यांचा शृंगार, त्यांचे रूसवे-फुगवे, त्यांचे हास्य-विनोद या सगळ्यांची पुराणं, महाकाव्य आणि महाशिल्प झाली. शिव आणि शक्ती यांनी मिळून सोळा विद्या आणि चौसष्ट कलांची पायाभरणी केली. आपल्या संस्कृतीच्या एकुण जडणघडणीमध्ये या जोडप्याचं महत्त्व ईतकं की अगदी नव-याला 'महादेव' म्हणेपर्यंत!

या जोडप्याचा महिमा ईतका की अगदी नव-याला 'महादेव' आणि बायकोला 'पार्वती' म्हणेपर्यंत! सामान्य लोकभाषेमध्ये ईतकं चपखल बसणं या जोडप्याला जमलं याचं कारण म्हणजे देवाधिदेव महादेवांची पत्नी झाली म्हणुन पार्वतीने आपलं सामान्यत्त्व त्यागलं नाही. उलट मुळातच असामान्य आणि अवलीया असणा-या शिवालाही तीनं सामान्य पतीसारखं रूसवे-फुगवे, प्रश्न-उत्तरे, प्रेम-शृंगार, हास्य-विनोद, वाद-विवाद, शर्यती ईत्यादिंमध्ये गुंतायला भाग पाडलं.

कार्तीकेय आणि गणेश या दोन पुत्रांवर तिनं केलेलं प्रेमही हीच गोष्ट अधिक स्पष्ट करतं. शिवाच्या त्रीशुळाने धडावेगळं झालेलं आपल्या लाडक्या पुत्राचं, गणेशाचं शिर हातात घेऊन टाहो फोडणारी पार्वती; मातापित्यांना ब्रम्हांड मानुन त्यांची प्रदक्षीणा करणा-या आपल्या या पुत्राला शर्यतीत विजयी ठरवणारी पार्वती; आणि  कार्तीकेयाच्या विरहात मनोमन अशृ ढाळणारी पार्वती; प्रत्येकवेळी पार्वतीने आपलं सामान्यत्त्व जपलंय. म्हणुनच लहानग्या गणपतीला  अंघोळ घालतांना, त्याचे लाडकोड करतांना माता पार्वतीच्या प्रतीमा प्रचलीत झाल्या. कोणत्याही आईला ते आपलं लेकरू वाटेल, आणि कोणत्याही लेकराला ती आपली माय वाटेल ईतकी सामान्यांशी जवळीक तीने जपली.

अश्या पार्वतीने जेव्हा शस्त्रे हाती घेऊन दुर्गेचं रूप धारण केलं, तेव्हा मात्र ते सगळं असामान्यच होतं! ज्याला पाहूनच भलेभले गर्भगळीत होतील अश्या विक्राल सिंहावर स्वार होणं, देवदेवतांना अगदी लिलया धूळ चारणा-या एकापेक्षा एक भयंकर राक्षसांच्या सैन्यात एकटीने घुसुन त्यांचा  निःपात करणं; आणि धडावेगळ्या केलेल्या शिरांची मुंडमाळ करून गळ्यात मिरवणं हे सगळं दैवी, असामान्य, अदभूतच म्हणावं लागेल. सामान्यत्त्वापासुन असामान्यत्त्वापर्यंत झालेला पार्वतीचा हा प्रवासच तीला पुर्णपणे आदिशक्तीचं रूप बनवतो. पार्वतीचा राजकन्या ते रणचंडी हा प्रवास म्हणजे एक सामान्य स्त्री काय काय करू शकते, किंबहूना तीने काय काय करावे याची गुरुकिल्ली आहे.

एक राजकन्या शिवप्राप्तीसाठी जीव धोक्यात घालून जर तपाची पराकाष्टा करू शकते, तर एक सामान्य मुलगी आपल्या लक्षप्राप्तीसाठी प्रयत्नांची पराकाष्टा नाही का करू शकत? एक पर्वतकन्या एका सतत ध्यानमग्न अवस्थेत राहणा-या, तापट पण भोळ्याभाबड्या पतीला जर काव्यशास्त्रविनोदाचं वेड लावू शकते, तर कुणी सामान्य शहरी मुलगी आपल्या  नव-याला सिग्रेट सोडायला नाही का लावू शकत? आणि एरवी कोमलांगी गौरी असलेली शिवप्रिया जर दुर्गारूप धारण करून एकटीने हजारो राक्षसांना कापून काढू शकते, तर आजची सामान्य मुलगी तीची छेड काढणा-या एखाद्याला चपला-जोड्याने नाही का बडवू शकत?

पार्वतीने स्वतःतील आदिशक्तीला ओळखुन, तीचे आवाहन करून सामान्य जीवनातून  असामान्य जीवनाकडे वाटचाल केली. मात्र यातही आपला सामान्य पिंड तीने कायम जपला.  आदिशक्ती देवीचे पहिले सगुण साकार सौभाग्यवती रूप आणि म्हणुनच नऊ रूपांच्या मालिकेतील तीसरे रूप म्हणजे पार्वती.

No comments:

Post a Comment