सध्या वारीच्या फोटोंनी फेसबुकच्या भिंती, वृत्तपत्राची पानं, आणि भावीकांची मनं भरून
गेलेली आहेत. आषाढी एकादशी -- महाराष्ट्राचा राष्ट्रीय लोकोत्सव अवघ्या काही
तासांवर येऊन ठेपलाय. वारीतील उभे रिंगण, गोल रिंगण, माउलींच्या पालखीबरोबर टाळ-मृदंगाच्या गजरात चालणारे
हजारो भावीक, मानाचा अश्व, तुळशीवृंदावनं डोक्यावर घेऊन
झपझप चालणा-या लाल-केशरी लुगड्यातल्या स्त्रीया, पताका, टाळ मृदंग घेऊन 'ज्ञानोबा माऊली तुकाराम'
च्या गजरात
तालबद्धरित्या पुढे जाणारे पांढ-या कपड्यातले वारकरी, भजन, किर्तन, नामाचा गजर, आणि अवघ्या वातावरणात
भरलेला पांडूरंग! वारीची जादू पंढरपूरपासुन अगदी शेकडो किलोमिटर दूरही जाणवतेय
ईतकी वारी महाराष्ट्राच्या, आपल्या मराठी जनमनाचा अविभाज्य भाग झालेली आहे.
आळंदी आणि देहू येथून येणा-या माऊलींच्या दोन महत्त्वाच्या पालख्या, शिवाय अगदी शेकडो
खेड्यांपाड्यांतुन येणारी भावीकांची रिघ, अगदी आंध्रप्रदेश, कर्नाटकातूनही येणा-या वा-या,
वारीच्या
उत्साहाचा अभ्यास आणि अनुभव करण्यासाठी जगभरातून वारीत सामील होणारे लोक, हे सगळं पाहिलं, वाचलं, की पुढच्या वर्षीची वारी
आपणही करून यावी असं वाटून जातं. अनेक वर्षापासुन असं वाटत आलेलं आहे. अजुन मात्र
वारीत जाण्याईतपत पुण्य खात्यावर जमा झालेलं नाही, असंच म्हणावं लागेल. पंढरपूरला
जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेणं हे या आधीही अनेकदा केलंय. कमी गर्दीच्या दिवसांत अगदी
तासाभरात दर्शन होवून बाहेर आल्यावर देवळाच्या सभामंडपात 'रूप पाहता लोचनी' म्हणणा-या वारक-यांच्या
समुहाबरोबर उभं राहून टाळ्याही वाजवल्या आहेत. 'याची देही याची डोळा' विठठलाची मुर्ती पाहिली, अगदी पायांना हात लावून दर्शन घेतलं, गाभा-यात क्षणभर उभं राहून 'तुळशिहार गळा कासे
पितांबर' असं
ते रूप डोळ्यात भरून घेण्याचं सौभाग्यही उपभोगलंय. पण वारी करून केलेलं विठूरायाचं
दर्शन अजुन नशिबात आलेलं नाही.
आषाढी एकादशीला पंढरपुरात अगदी लक्षावधी विठ्ठलभक्तांचा मेळा लागलेला असतो.
दोन दोन दिवस रांगेत उभे राहण्यात जातात, आणि कधीतरी द्वादशिला, त्रयोदशिला दर्शन मिळतं, असं लोक सांगतात. आषाढी एकादशीचा मुहुर्त साधण्यासाठी केलेला हा
वारीचा अट्टहास, काही हजार भाविकांचाच पुर्ण होत असावा. ईतर लाखो लोक पंढरीचं, चंद्रभागेचं, कळसाचं किंवा जो देवळात
दर्शन घेऊन आलाय, त्याचं दर्शन घेऊनच स्वतःला धन्य मानतात. मग ईतका मोठा व्याप, पायी चालण्याचे एवढे
कष्ट, का
म्हणून करायचे? बरं पायी निवळ चालत राहणं म्हणजेच वारी नव्हे! रिंगणामध्ये हाती असेल नसेल
तेवढ्या जड-हलक्या वस्तू घेऊन धावावं लागतं! माउलींची पालखी विसाव्याला खाली
ठेवल्या शिवाय वारकरी खालीही बसत नाहीत!! वारक-यांची स्वतःची संघटना आहे, त्यांचे नियम, अटी आहेत, त्यांचं काटेकोरपणे पालन
झालं पाहिजे!! कधीमधी अचानक ढग दाटून येतात, मुसळधार पाऊसही येतो!! तश्यातही
चालत रहावं लागतं. वारी करणे म्हणजे काही गम्मत नाही. खेड्यापाड्यात बारा महिने
अठरा काळ कष्टाची कामं करणारी भावीकमंडळीच हे दिव्य करू शकतात. एक मात्र खरं की
वारीत कुणालाच थकवा येत नाही! अगदी साधे वारीचे फोटो पाहिले तरी आपल्याला आलेला
शिणही कुठच्या कुठे पळून जाईल ईतकी ताकद त्यामध्ये असते. पांडुरंग या काळात पंढरपूरच्या त्या
देवळात नसतोच. तो तर वारीतच कुठेतरी चालत, नाचत, धावत असावा. हो! म्हणुनच रिंगणामध्ये धाव धाव
धावूनही भावीक थकत नाहीत. शेकडो किलोमिटरचा प्रवास पायी चालत करूनही त्यांना शिण
येत नाही. दर्शन होवो अथवा न होवो,
त्यांना
कसलीच पर्वा रहात नाही. वारीत चालतांना सगळ्यांची ओळख असण्याचीही गरज नसते. सगळेच
माऊली! एकमेकांच्या पायांना हात लावून नमस्कार करायचा! सोशल नेटवर्कींगचा हा
उच्चतम स्तर नव्हे का?
ईतका मोठा प्रवास निवळ चालत करत राहिलं तर किती निरस वाटलं असतं ना? म्हणुन मग रिंगण करण्याची कल्पना आली असावी. चालून
चालून अंग अकडून जाऊ नये म्हणुन विठूनामाच्या तालावर भावीक पारंपारिक उड्या मारतात, पावलांची विषिष्ट पद्दतीने हालचाल करून नृत्य करतात, हे सगळे एरोबिक्सचे, रिलॅक्सेशनचे व्यायामप्रकारच नव्हेत का?
रात्रीच्या वेळी किर्तन होतं. किर्तनात आख्यानामध्ये भक्त-भगवंताची कथा रंगवली
जाते. म्हणजे थोडक्यात गोष्ट सांगीतली जाते. गजर केला जातो. स्ट्रेस मॅनॅजमेन्टचा
हा सर्वात सोप्पा आणि प्रभावी प्रकार नव्हे का? कॅंटरबरीच्या छोट्याश्या यात्रेत भाविकांनी एकमेकांना सांगीतलेल्या गोष्टीचं
कॅंटरबरी टेल्स नावाचं जसं भलंमोठं अजरामर साहित्य निर्माण झालं, तसंच शेकडो वर्षांपासुन अविरत चाललेल्या वारीत
संत-वारक-यांनी केलेल्या किर्तनांच्या आख्यायिका बनल्यात. संतांनी दुर्बोध
वेद-पुराण आणि महाकाव्यांच्या सुबोध लोककथा बनवल्या. लोककथांतून लोकमानस बनलं. आणि
त्यातून अवघा महाराष्ट्र घडला. व्हॅल्यु एज्युकेशन, मास अवेकनिंग, आणि लोकसहभागातून विकास
वगैरेंच्या सा-या कल्पना अवघा महाराष्ट्र घडवणा-या या वारीपुढे थीट्या नाही का
वाटत?
म्हणुन वारीत जाणं म्हणजेच विठ्ठलाला भेटणं! जीवन घडवणारी, मन प्रसन्न करणारी, वर्षभराच्या कष्टाच्या कामासाठी उर्जा देणारी वारी म्हणजेच विठठल होते. देवळात
पुंडलीकानं भिरकावलेल्या विटेवर 'युगे अठठावीस' उभा असलेला विठठल वारीतल्या भावीकांनी ज्या जागी विट
भिरकावली, त्याच जागी येऊन विटेवर
उभा राहतो. सर्व भक्तांना पुंडलीक बनवणा-या या वारीच्या परंपरेलाच जोहार करावा!
विठ्ठलापर्यंत तो आपोआपच पोचेल.