9.9.09

मोबाईल

अचानक मोबाईल खराब झाला. काही बटणं पुरती कामातूनच गेली. एसएमएस पण टाईप करता येइनासा झालाय आणि कुणाला फोन लावावा म्हटलं, तर तेही मोठं कठीण होउन बसलंय. कुणाचा फोन आला, तर तो उचलायचा की नाही, हे ही आता मोबाईलच ठरवतोय. कारण रिसिव्ह चं बटण कधी काम करेल, आणि कधी नाही, हे त्याचं त्यालाच ठाऊक आहे. गैरसोय होत आहे. पण हा देखील एक नवा अनुभव. वस्तू आहे. कधी ना कधी खराब व्हायचीच. दूसरीही येइल. पण या मोबाईलच्या खराब होण्याच्या निमित्ताने आठवणींच्या एसएमएस नी मनाचा ईनबॉक्स फूल करून टाकला, त्याचं काय?
मिळाला तेव्हा खूप क्रेझ होती मोबाईलची. जेव्हा भाउबिजेला अनिल मामाने आईला ओवाळणीत मोबाईल दिला, तेव्हा मलाच धन्य झाल्यागत वाटलं होतं. तासनतास 'स्नेक' खेळत बसायचो, या गोष्टीचं आज आश्चर्य वाटतं, पण हाईयस्ट स्कोरमध्ये साडेचारहजाराचा आकडा पाहिला, की परत विश्वास बसतो. वेड होतं. आपण वेडे होतो का तेव्हा?! नाही. पण ते दिवसच बेटे तसे होते. कुणाचा तरी फोन यावा आणि मोबाईलची रिंगटोन वाजावी म्हणून कान टवकारूनच बसलेलो असायचो. फोन यायचाच नाही सहसा. आला तर एखादा, तोही मोबाईल कंपनीवाल्यांचा फोन. त्याचंच भारी अप्रूप होतं. कुण्या नातेवाईकाचा फोन एखाद्यावेळी आलाच, तर खूप नवल वाटायचं. मित्र तर फोन करतच नव्हते. मिसकॉलचीच भाषा प्रचलीत होती. कारण पैसेच नसायचे तीतके खीशात.
पैसे नाहीत म्हटल्यावर मैत्रीणी कश्या असणार? मग त्यांचेही एसएमएस किंवा कॉल्सही नव्हते. मोबाईल मुकाच पडलेला असायचा. अरेच्या, चुकलो. मोबाईल मुका असायचा,पण पडलेला नसायचा. जवळच असायचा नेहमी. वाटायचं की कुणाचातरी फोन येइल. कधीकधीच ही ईच्छा पुर्ण व्हायची. त्यातही कधी एखाद्या अनोळखी नंबरवरून कॉल आला, तर खूपच अप्रुप! सलग दोनचारवेळा त्याच नंबरवरून मिसकॉल आला, तरी एक कहाणी बनायला पुरेसं होतं. रॉंग नंबर आलाच कधीमधी, आणि समोर मुलीचा आवाज असला, तर ही गोष्ट कॅन्टीनमध्ये एक-एक चहा आणि ब्रेडपकोडा खीलवण्यासाठी पुरेशी असायची.

ऐनवेळेवर नाटकाच्या प्रॅक्टीसची बदलेलेली वेळ सगळ्यांना मी याच मोबाईलवरूनच कळवायचो. राज्यनाट्यस्पर्धेत प्रशस्तीपत्र मिळाल्याबद्दल अभिनंदनाचे फोनही यानेच रिसिव्ह केलेत. सकाळच्या एकांकीका स्पर्धेत मी बसवलेलं नाटक अव्वल आल्याचा फोनही वैभव टप्पेने याच मोबाईलवर केलेला होता. याच मोबाईलवर फायनल ईयरचा निकाल नेटवर आल्याची खबर मी सगळ्या मित्रांना दिली. याच मोबाईलवर 'ईस धीस चैतन्य? आय ऍम आलोक तीवारी फ्रॉम हितवाद. यू आर सिलेक्टेड फॉर द जॉब." म्हणून फोनही मी रिसीव्ह केला. गाव सोडून जातांना "मोबाईलमध्ये पैसे आहे नं रे? बोलावसं वाटलं तर फोन करशील," असं म्हणून आपल्या डोळ्यातलं पाणी लपवणारी आई -- "आता मोबाईल आहे नं त्याच्याजवळ, कधीही वाटलं, तर लावायचा फोन!" असं म्हणणारे बाबा -- आणि "दादाचा मोबाईल नंबर - ९९२२३२९९७६" असं आपल्या गोलगोल अक्षरात फोनजवळच्या भिंतीवर लिहून ठेवणारी लहान बहीण. या मोबाईलचीच देण नव्हती का?
ज्याच्यामुळे हा मोबाईल मिळाला, तो अनिलमामा खूप सिरिअस असल्याची बातमीही याच फोनवरती ऐकली. अनिलमामा अवेळी निघुन गेल्याची बोहारी बातमीही याच फोनने दिली. त्याची आठवण म्हणून हा फोन खूप दिवस वापरायचा, कधीच नाही सोडायचा, हे तेव्हा ठरवलं होतं. कदाचीत खूप दिवस झालेत आता. खूप दिवस.

27.5.09

पाऊस

हल्ली संध्याकाळी आभाळ भरून येतं. पण पाऊस येत नाही. दूपारच्या तळपत्या उन्हानंतर संध्याकाळी जरावेळ थंड वारंही वाहतं. पण पाऊस मात्र येत नाही. अगदीच नाही असंही नाही, पण आला तरी दोन चार थेंब. त्यानंतर नाही. वारा ढगांना घेऊन जातो असं म्हणतात ना, तसे "बरसतो बरसतो..." असं म्हणत ढगांची स्वारी अलगद गडप होते. या शहराची म्हणे ही रीतच आहे.
गावात मात्र पाऊस असा यायचा नाही. उन्हाळ्याच्या शेवटी शेवटी एखाद्या संध्याकाळी ढगांची दाटी व्हायची आणि अवघ्या काही क्षणांत जणू आभाळ फाटल्यासारखा मुसळधार बरसायला लागायचा पाऊस. बाहेर वाळत टाकलेले कपडे दोरीवरून काढून आणायला गेलेली आई तेवढ्या वेळातच ओलीचींब होउन जायची, ईतका पावसाचा जोर असायचा. मग विजाही चमकायच्या आणि वादळही! कितीही खीडक्यांची तावदानं लावा, की दरवाजे बंद करा, पाऊस घरात यायचाच. चारही दिशांनी झोडपून काढायचा.
विजा कडाडत असतांना बाहेर जायला मिळायचं नाही, तेव्हा घरातनंच पाऊस पहायला लागायचा. मग एखाद्यावेळी मोठा प्रकाश बाहेर दिसला, की थोड्यावेळाने मोठी विज कडाडण्याचा आवाज येणार, त्याची वाट पहात बसायचं. प्रकाशाचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त आहे, म्हणून विज चमकलेली आधी दिसते. मग तीचा कडकडाट ऐकू येतो. हे खूप नंतर माहिती झालं, पण त्याआधी जास्त चमकणार्र्या विजेवरून येणारा आवाज किती मोठा असेल याची कल्पना करण्यातच मजा यायची.
पाऊस आमच्या पुर्वमुखी घराच्या मोठ्या दरवाज्यातूनच घरात दाखल व्हायचा. बैठकीच्या खोलीतल्या खीडकीमधून आत येऊन तो स्टुलवर ठेवलेला आजचा पेपर ओला करायचा. आजीच्या खोलीच्या मोठ्या खीडकीतून येणारा पाऊस हमखास तीची अवघी खोलीच भिजवून टाकायचा. आजी मात्र ज्या खोलीत गहू आणि तांदळाच्या कोठ्या होत्या, तीकडे जाऊन उभी असलेली असायची. धान्य भिजलं, तर ते खराब होईल, म्हणून खीडकीच्या फुटक्या तावदानाला ती पेपरच्या गट्ठ्याने झाकत असायची.
पण शहर मुळातच ऋतूवेगळं आहे. ईथे पाऊस आला तरी तो ऑफीसमध्ये जायच्या-यायच्या वेळेपर्यंत दहा-पंधरा मिनिटांची सुट देतो. क़ुणालाच तो जबरदस्ती भिजवत नाही. आडोसेही लवकर मिळतात. आणि शिस्तीत पडणारा पाऊस आडोशाला उभ्या असलेल्या एक्झीकेटीव्जना भिजवतही नाही.
पहिला पाऊस अचानक येत नाही. वेल ईन ऍडव्हान्स नोटीस देऊन येतो. दोन तीन वेळा ढग़ दाटून येतात. पाऊस येत नाही. ही नोटीस समजून लोक गाडीच्या डिक्कीत रेनकोट ठेवणं सुरू करतात. पहिल्याच पावसात रेनकोट निघालेले पाहिले, की आश्चर्यही वाटतं, आणि कामाच्या व्यापात निसर्गाचा आनंद गमावलेल्या लोकांची किवही येते. पण मीही आता याच गर्दीचा भाग आहे.
त्या दिवशी असेच ढग दाटून आले. खूप पाऊस येणार असं वाटलं. म्हटलं भिजायचंच! आणि मुद्दाम निघालो. वारा-वावटळ खूप आली. पण पाऊस आलाच नाही. हिल-टॉप, सिव्हील लाईन्स या तूलनेने हिरव्या भागातही गेलो. पाऊस आला नाही. फुटाळा तलावाच्या काठावर जाऊन उभा राहिलो. पाऊस आलाच नाही. निराश झालो. घरी आलो. आणि शिस्तबद्ध पावसाने बरसायला सुरूवात केली. शहरातला पाऊसच भिजवायला तयार नसतो. मग लोक कोरडेच राहीले, त्यात काय नवल?
तू देखील शहरात राहून कोरडीच राहीलेलीस. मी जे बोललो, त्यातला ओलावा तूला कळलाच नाही. नाही तर नाही. यात तूझा दोष नाही. शहराचाही नाही. हल्ली गावामध्ये राहाणार्र्यांच्या मनातही शहरच वसलेलं असतं. तीथे शहरातच राहिलेल्यांची काय कथा? असो. पावसात भिजायची ईच्छाच झाली नाही, तर न भिजल्याचं दुःख होत नाही. पण भिजायचं असूनही रेनकोट चढवणं म्हणजे मन् मारणं नाही का? तू मन मारतेयस्. भिजत नाहीयेस. आडोशालाच उभी आहेस. आता मी शहराचाच भाग झालोय. म्हणून पाऊसही शहरी आहे. तो तूला जबरदस्तीने भिजवणार नाही. कितीही ईच्छा असली, तरीही.