16.10.12

आदिशक्ती


जागृत करुनी निरंकारा।निर्गूण आणिले आकारा॥
त्रिविध गुण लावूनी संसारा।रचिला जगडंबर सारा।
भू:जल तेज गगनवारा।बहु तत्वांच्या परिवारां॥
उत्पत्ती स्थिती संहारा।लाविले हिने विधी हरिहरा॥
करुनी परिमाण,केले निर्माण,जगाचे प्राण,सकळही सृष्टी मुळारंभा।

आपल्या परंपरांना प्रमाण मानलं तर आदिशक्तीच्याच प्रेरणेने विश्वाची निर्मीती झाली असं म्हणावं लागेल. अर्थात, कुणीही विज्ञानवादी ही गोष्ट मानणार नाही. कुणातरी एका देवीने निराकार विश्व जागृत करून जगाची निर्मीती केली, ही गोष्ट खरोखरच विज्ञान मानणा-या मनाला पटत नाही. विश्वनिर्मितीच्या पाऊलखुणा शोधत शोधत आता आपण बिग बॅन्गपर्यंत येऊन पोचलो आहोत. बिग बॅन्ग हे विश्वाच्या निर्मीतीचे कारण आहे, ही गोष्ट मानली, तर हा महास्फोट होण्यामागे काहीतरी कारण असायला पाहिजे. कदाचित उद्या जाऊन विज्ञान ते कारणही शोधून काढेल की कसल्यातरी 'बिग चेंज' मुळे हे बिग बॅन्ग घडले. परत प्रश्न आलाच, की हा बिग चेन्ज कुणी घडवून आणला! मुळ काय? प्रश्नातून प्रश्नच जन्म घेत राहतील, जर 'वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या' नावाखाली आपण आपल्याकडे मुळात असलेल्या उत्तराकडे दुर्लक्षच करत राहू!

कसलीतरी प्रेरक शक्ती या सर्व घटनांच्या मागे आहे, यावर तर कुणाचंच दुमत नसावं. याच प्रेरक शक्तीची आपल्या संस्कृत्तीने आदिशक्तीचे नाव देऊन पुजा बांधली आहे. आदिशक्ती ही एक कोण एक स्त्री किंवा देवी नाही. ते एक तत्त्व आहे. विश्वनिर्मितीमागची, सजीवतेची प्रेरणा देणारी एक शक्ती. छोटीशी मोपेड गाडी असो वा सुखोई विमान, ते सुरू करण्यासाठी एक ईग्नीशन लागतंच. चावी फिरवावी लागते. नॉब खालून वर करावा लागतो. बटण दाबावं लागतं. ही चावी, नॉब किंवा बटण म्हणजे जर 'बिग बॅन्ग' असेल तर ती फिरवणारे हात म्हणजे आदिशक्ती.

हे हात कुणीच पाहिले नसतात, कारण चावी फिरवून, बटण दाबून आणि मशिन सुरू करून ते बाजुला झालेले असतात. आपण या जीवसृष्टीच्या मशिनमध्ये आत कुठेतरी फिरणारे पुर्जे असतो.  आपल्याला कुठे दिसणार चालवीणा-याचे हात? पण म्हणुन चालवणारे हात तीथे नाहीतच असं अजीबात नसतं. चालवणारा आहे तोवरच गाडी सुरू राहू शकते. आपल्या जीवसृष्टीची गाडी सुरू आहे. म्हणजे चालवणारे हात आहेत. हे हात म्हणजेच आदिशक्ती.

निर्गुण निराकाराची संकल्पना मुळात समजणंच कठीण. आपल्यासारख्यांच्या डोक्याच्या अगदीच बाहेर. म्हणुनच कदाचित आपल्या समाधानासाठी किंवा सोयिसाठी आपण या अदृ:श शक्तीला दृ:श रूपात आणलं. मग ही जीवन देणारी शक्ती असल्याने सहाजीकच तीला मातेचं, स्त्रीचं रूप मिळालं. पुढे वाईट शक्तींचा अंत करण्यासाठी ज्या स्त्रीयांनी शस्त्रे हाती घेऊन अतुल पराक्रम गाजवला, त्यांना याच प्रतिमेशी जुळवून त्यांच्या दंतकथा निर्माण झाल्या. शेवटी सगळ्या रूपांना केलेला नमस्कार जाऊन मिळतोय तो एकाच ठीकाणी.

वैदिक काळातील ऋषिंमुनिंना सुर्यमालेतले नऊ ग्रह कुठल्याही हाय-एन्ड टेलिस्कोपशिवाय दिसले, त्यांच्या भ्रमणकक्षात्यांचा भ्रमण कालावधी, त्यांच्यावरील दिवस-रात्रीची गणितंही समजली, यावरूनच आजच्या कुठल्याही वैज्ञानिकापेक्षा त्यांची समज जास्त होती हे सिद्ध होते. त्यांनी या कथा, ही रूपं वर्णन केली. म्हणजे नेमकी हीच रूपं रंगवण्यामागे काहीतरी अभ्यास, हेतू असला पाहिजे हे नक्की.

म्हणुनच आदिशक्ती जरी कुणालाच दिसणारी नसली, तरी तीची ही दर्शनी रूपं त्या मुळ रूपाच्या खुप जवळ नेऊन ठेवणारी आहेत, असं म्हणायला हरकत नाही. म्हणुनच देवीच्या नऊ रूपांपैकी पहिलं रूप निर्गुण आदिशक्ती आहे. आणि नंतर सुरू होतात ते तीने स्वतः रचलेल्या या जगडंबराच्या कल्याणासाठी निर्माण झालेली तिचीच ईतर रूपे.

15.10.12

जय माता दि!


वातावरणातला बदल एका दिवसात जाणवायला लागतो. धुपाचा, राळेचा सुगंध, आरतीच्या वेळी होणा-या घंटानादाची किणकिण, शंखाचा धिरगंभीर आवाज, आणि 'साचे दरबार की जय' चा तो चिरपरिचीत जयघोष -- आपोआपच या सर्व गोष्टी जाणवू लागतात आणि मन नव्या उमेदिने भरून येऊ लागते. नवरात्रीचे नऊ दिवस सुरू झालेले असतात. कधी नव्हे ते उपास करावेसे वाटतात. आंघोळ केल्याशिवाय घराच्या बाहेर पडण्याची ईच्छाच होत नाही. वातावरणात पसरलेला धुपाचा मंद सुगंध आत अगदी हृदयापर्यंत पसरल्याची जाणीव होत राहते. आपणही या नऊ दिवसात अंतर्बाह्य बदलून गेल्याचीच जाणीव! आदिशक्तीचं पर्व म्हणतात ते यामुळेच. आपल्या हृदयाला धडधडण्याची प्रेरणा देणा-या, या ब्रम्हांडात जीव भरणा-या एका मुलशक्तीच्या पुजनाचे हे नऊ दिवस. 

बिग बॅन्गच्या थेअरीमुळे विश्वाची निर्मीती झाली आणि गॉड पार्टीकल हा ब्रम्हांडातील सर्वांत सुक्ष्म अणुकण आहे, ईथपर्यंतचा शोध विज्ञानाने लावला असला, तरीही बिग बॅन्ग ला घडवून आणण्यामागे कसलीतरी शक्ती आहे, हे कुणीही टाळत नाही. आईन्स्टाईनपासुन ते डार्वीनपर्यंत सर्व वैज्ञानिकांनी एका मुलप्रेरक शक्तीची संकल्पना मान्य केली आहे. खरा विज्ञाननिष्ट ही संकल्पना मान्य करतोच. मग शास्त्रज्ञ त्याला काहीतरी वैज्ञानीक नाव देतात आणि सामान्य लोक म्हणतात - आदिशक्ती!

आपल्याला विश्वाची निर्मीती वगैरे मोठमोठ्या गोष्टीत जायचेच नाही. वैष्णवदेवीच्या नुकत्याच केलेल्या यात्रेत झालेली अनुभुतीच देवी दाखवायला सक्षम आहे. धड दोन किलोमिटर चालण्याची सवय नसलेले आम्ही पंधरा लोक चौदा किलोमिटरचा डोंगर चढत वरपर्यंत पोचलो. वैष्णोदेवीचा डोंगर चढतांना थकवाच येत नाही, वगैरे गोष्टी ऐकल्या होत्या. त्या सपशेल खोट्या असल्याचा प्रत्यय आला तो खरंच डोंगर चढून गेल्यावर. पायात मोठमोठे गोळे आलेले आणि जागचं हलावंसंही वाटेना ईतका जास्त थकवा. पण तरीही पुढे चालत राहिलो. कसेकाय

थकून विसाव्याला बसलं, की आजुबाजुच्या यात्रेकरूंकडे सहज नजर जायची. काठी टेकवत टेकवत हळूहळू पुढे जाणारी ती सत्तरीच्या घरातली म्हातारी, 'जोर से बोलो जय माता दि' म्हणत वडिलांच्या चालण्याच्या गतीशी जुळवून घेत स्वतः धावणारा पाच वर्षाचा तो मुलगा; नाजुक हा शब्द खुप कमी पडेल ईतकी नाजुक -- अक्षरशः गुलाबी असलेली आपली अनवाणी पावलं 'जय माता दि' च्या नामजपासरशी झपझप पुढे टाकणारी ती सतरा-अठरा वर्षाची मुलगी. सहाएक महिन्याच्या आपल्या मुलीला पाठीवर बांधून घेऊन जाणारी ती आई, आणि चारेक वर्षाच्या मुलाला खांद्यावर बसवून चालत जाणारे बाबा... अशी कितीतरी उदाहरणं पाहिली की आपोआपच चालण्याची उमेद मिळायची. 'आपल्यालाही जायचंय' असं सहज वाटून जायचं आणि पावलांत शक्ती यायची, आपोआप!

वरच्या गुहेमध्ये पाचेक सेकंदांपर्यत झालेलं देवीच्या तीन पिंडांचं दर्शन म्हणजे वैष्णोदेवी नव्हेच! वैष्णोदेवी चौदा किलोमिटरचा पहाड चढण्याची उमेद आहे. हसत हसत काठी टेकवत पुढे जाणारी ती म्हातारीही वैष्णोदेवी आहे. अनवाणी पायांनी गड चढणारी ती मुलगी, पाठीवर मुलीला बांधून 'जय माता दि' म्हणणारी ती आई, आणि खांद्यावर मुलाला बसवून 'प्रेम से बोलो' म्हणायला लावणारे ते बाबा... वैष्णोदेवी तीथे भेटते. गड चढून झाल्यावर त्याहीपेक्षा वर असलेल्या भैरवबाबांच्या मंदिरात जाण्याची सहज येणारी उमेद म्हणजे वैष्णोदेवी आहे. उतरतांना सहज ओठावरती येणारे भजन म्हणजे वैष्णोदेवी आहे. खाली उतरल्यावर आपल्या बसमध्ये परत बसतांना ढगाच्या आड कुठेतरी लपलेल्या दरबाराकडे नजर टाकून 'आपण त्या ढगाच्या आत जाऊन आलो!' हा विचार केल्यावर चेह-यावर येणारं हास्य म्हणजे वैष्णोदेवी! 'आपणही करून दाखवलं' आणि 'आपल्यातही शक्ती आहे' ही अनुभुती म्हणजे वैष्णोदेवी आणि आणि उतरल्यानंतर पायांचा भुगा झालेला असुनही 'पुन्हा एकदा यावंच लागते!' अशी ईच्छा मनात राहणे, म्हणजे वैष्णोदेवी आहे.

चराचरात व्यापलेल्या शक्तीचा अंश आपल्यातही आहे याची प्रचिती आली, म्हणजे सार्थक झालं की नऊ दिवसांचं. म्हणुनच आपल्या शरीर आणि मनाला आव्हान देऊन ही प्रचिती घेण्यासाठी कठीण व्रतवैकल्ये आणि उपासांची परंपरा सुरू झाली असणार. देवीच्या या नऊ दिवसांमध्ये आजवर वाचून ऐकून आणि समजुन घेतल्यावर उमगलेली देवीची नऊ रूपं मला कळली तशी मांडण्याचा विचार केला आहे. बघूया कसं जमतंय ते. 


26.8.12

सन्नाटा....

'इतना सन्नाटा क्यु है भाई?' हा काही 'आज खुष तो बहोत होंगे तुम' सारखा पल्लेदार संवाद नाही. 'मेरे पास मा है' सारखा सुपरपॉवरफुल पंचही त्यात नाही. 'आय़ हेट टिअर्स' सारखा तो एका सुपरस्टारच्या तोंडून येत नाही, किंवा 'कितने आदमी थे?' सारखा तो सुपरव्हिलनच्या तोंडूनही येत नाही. तरीही या सर्व संवांदांईतकंच महत्त्व चित्रसृष्टीच्या ईतीहासात 'इतना सन्नाटा क्यु है भाई?' ला देखील प्राप्त झालं आहे. हा संवाद लिहणा-या सलीम-जावेद या जोडीइतकं, आणि त्याची कल्पकतेनं रचना करणा-या रमेश सिप्पींच्या दिग्दर्शनाईतशकंच; किंबहुना या सगळ्यांहून जास्तच कसब या संवादाच्या वेळी मानावं लागेल ते रहिम चाचा रंगवणा-या ए के हंगल यांचं!! सन्नाटा क्यु है विचारणारे रहिम चाचा आता आपल्यात नाहीत. आपल्यासाठी ते सोडून गेलेत फक्त... सन्नाटा!

ए के हंगल पंचाण्ण्यव वर्षांचे होते. अनेक महिन्यांपासुन ते आजारी होते. त्यांच्यापेक्षा उण्यापु-या पाच वर्षांनी मोठ्या असलेल्या भारतीय चित्रसृष्टीशी त्यांचं नातं मात्र कायम होतं. अगदी हल्लीच, म्हणजे दोन वर्षांपुर्वी त्यांनी रिलायन्सच्या 'क्रिष्णा और कंस' या ऍनिमेशनपटात महाराज उग्रसेनासाठी रेकॉर्डिंग केलं होतं. हा सिनेमा या जन्माष्टमीच्या मुहुर्तावर प्रदर्शित करतांना "ए के हंगल यांनीही मोठ्या उत्साहाने आमच्यासाठी रेकॉर्डींग केलं," हे बिग ऍनिमेशन्सच्या आशिष कुलकर्णींनी किती म्हणुन अभिमानाने सांगीतलं होतं! 'मेकिंग ऑफ क्रिष्णा' मध्ये ए के हंगल यांचा स्पेशल बाईटही घेतलेला होता. ऍनिमेशनपटासाठी रेकॉर्डींग करणं ही कल्पनाच पुर्णतः नवीन  असल्यामुळे आपण याला नवे आव्हान म्हणुन स्विकारल्याचं तेव्हा हंगल यांनी सांगींल्याचं लक्षात आहे. वयाची शंभरी गाठत असतांना नव्या कल्पनांचा आव्हान म्हणुन स्विकार करणा-या या 'ओल्ड मॅन' ला कोण बरं ओल्ड म्हणेल?

पण हंगल यांना 'ओल्ड मॅन' हेच बिरूद कायमचं जोडल्या गेलेलं होतं. सिनेमा समजायला लागला तेव्हापासुन त्यांना म्हाता-याच्याच भुमिकेत पाहिल्याचं आठवतं. टिव्हिवरच्या कुठल्याश्या कार्यक्रमात 'अनेकांना चिरतारूण्याचं वरदान लाभतं तसं हंगल यांना चिरवार्धक्याचं वरदान लाभलंय' असली काहीतरी टिप्पणी ऐकलेली  आज आठवतेय. वार्धक्य हे वरदान म्हणावं की नाही, हा प्रश्नच आहे, पण हंगल यांनी मात्र त्याचा उपयोग वरदानासारखाच केला, हे सांगणे न लगे.
बावर्ची मधला त्यांनी रंगवलेला मोठा काका असो, किंवा 'ओ हो हो दिपिकाजी आईये आईये' म्हणणारा त्यांचा हसमुख दुकानदार असो, 'नरम गरम' मधला त्रस्त झालेला कुशी चा बाप असो किंवा अगदी लगान मधला त्यांचा 'पानी तो बरसाओ' म्हणुन आकाशाकडे टक लावून पहाणारा गावातला सर्वात वयोवृद्ध म्हातारा असो; यात त्या त्या व्यक्तीरेखेबरोबरच तितक्याच प्रभाविपणे लक्षात राहतो तो ए के हंगल नावाचा कलाकार! 
हंगल यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं तेच मुळी त्यांच्या वयाच्या पन्नासाव्या वर्षी. त्यामुळे चरित्र भुमिका हेच त्यांचे क्षेत्र राहणार हे नक्कीच होतं. चित्रपटसृष्टीत येण्याआधी आणि त्यानंतरही हंगल कम्युनिस्ट पक्षाचे खंदे कार्यकर्ते होते आणि राहिले. त्यांच्या जुन्या आणि पक्क्या साम्यवादी विचारांच्या पायाचा वापर त्यांनी रंगमंच आणि नंतर चित्रपटसृष्टीमध्येही एक आदर्शवादी आणि सामान्य भारतीय मध्यमवर्गीय व्यक्तीरेखा उभ्या करतांना खुप चांगल्या पद्धतीने करून घेतला. आर के लक्ष्मण यांचा 'कॉमन मॅन' हंगल यांच्यासारखा दिसत नसेलही कदाचित; पण ईंडियन कॉमन मॅन म्हटलं की हंगल यांनी रंगवलेल्या व्यक्तिरेखाच समोर येतात.

समाजकारण, रंगमंच, चित्रपटक्षेत्रातली चार दशके, टिव्हीवर गाजवलेला एक काळ, आणि नुकतीच बदलत्या काळातल्या डेली सोपमध्ये 'मधुबाला' च्या माध्यमातुन घेतलेली एक छोटीशी एन्ट्री -- ए के हंगल या एका व्यक्तीने पंचाण्णव वर्षाच्या आयुष्यात केलेलं मल्टीटास्कींग थक्क करणारं आहे. हे सगळं करतांना आपला व्यासंग, विचार आणि 'सन्नाटा' यांच्याशी असलेलं आपलं नातं त्यांनी नेहमी जपलं. त्यांचं काम सुरू  राहिलं ते त्यांनी केलेल्या भुमीकांप्रमाणेच साध्या आणि सरळ पद्धतीने. चित्रसृष्टीने त्यांची हवी तशी दखल घेतली, न घेतली हा विषय हंगल यांच्या उतारवयात त्यांच्यासाठी फार अलाहिदा होता. स्टॅंड-अप कॉमेडी शोजचं भरमसाठ पीक येऊ लागलं तेव्हा हंगल साहेब आणि त्यांचा सन्नाटा हा विनोदाचा विषय झाला.
हंगल साहेबांनी याकडे लक्ष दिलंच नाही. नवं काहीतरी करण्याचा त्यांचा शोध सुरू राहिला.

या वर्षी चित्रपटसृष्टीला शंभर वर्ष पुर्ण झालीत की तीची शंभर वर्ष भरलीत हे कळायला मार्ग नाहीय. देव आनंद, राजेश खन्ना, दारा सिंग, आणि आता ए के हंगल. शंभरावं वर्ष आणखी काय काय दैवदुर्वीलास दाखवणार आहे ते आता बघायचे. मात्र 'शो मस्ट गो ऑन' चा मुलमंत्र चित्रपटजगताने जपलाय. जपत राहणार आहे. हा मंत्र हरपत असल्याची जाणीव जरी त्यांना झाली, तरी हंगल साहेब सगळ्यांना जागं करत विचारतील - ईतना सन्नाटा क्यु है भाई?

21.8.12

जीव जडल्यावर मन मोडतांना


जीव जडल्यावर मन मोडतांना होणा-या वेदना कश्या असतात याचा अनुभव घेत नागपूर सोडलं तेव्हा पहाटेचे चार वाजले होते. केरला एक्सप्रेसच्या खिडकीच्या बाहेरून हात हलवणारे बाबा त्यांच्या चेह-यावरची काळजी आणि लेकरू दूर जाण्याचं दुःख लपवू शकत नव्हते. पत्रकारांसाठी खुप महत्त्वाच्या आणि मानाच्या असलेल्या या शिबिरासाठी जाणा-या मला हात हलवून शुभेच्छा देणा-या मित्राच्या मनात अभिमान, आनंद आणि हूरहूर सगळं एकत्र दाटून आलेलं. वर्षभर ज्या क्षणासाठी अनेक प्रयत्न केले  तो क्षण प्रत्यक्षात येत असल्याचा आनंद आणि येत्या महिन्याभरात अनुभवांच्या खजीन्यात होणार असलेल्या दशलक्षावधी टनांच्या वृद्धीबद्दल वाटणारं सुख या सर्वांनी मी तर हूरळून जायला हवं  होतं. पण माझी अवस्था पुर्णतः वेगळीच झाली. प्रत्यक्ष रडायला येत नव्हतं, पण आसु थांबत नाहीयेत असं वाटत होतं. तयारी निट सुरू होती. सामान निट पॅक करणे, सुटकेससाठी कुलुप  घेणे, ट्रेनमध्येही सग़ळं सामान निट ठेवणे, सगळं काही यंत्रवत सुरू होतं. शरीर काम करतंय आणि मन कुठेतरी कोप-यात बसुन रडतंय अशी अवस्था झालेली. पुन्हापुन्हा तिचा चेहरा डोळ्यासमोर येत होता.

"मी रडणार नाही. नाहीतर माझा रडका चेहराच तुझ्या लक्षात राहिल. एक महिन्यापेक्षा जास्त दिवस काढायचे आहेत ना आपल्याला!," तीचं स्वतःला समजावणं आणि मला धिर देणं सुरू होतं.
दोघांनाही वाटत होतं की एकमेकांपुढे रडायचं नाही आणि दोघांनाही माहिती होतं की एकट्यात दोघेही खुप रडणार आहोत. आणि का नाही येणार रडू? आता काल-परवा तर सगळं सुरळीत होउ लागलेलं होतं. ईथे काल-परवा म्हणजे अगदी शब्दशः काल परवा!

सोळा तारखेला लग्न ठरलं आणि अठरा तारखेपासुन महिन्याभराचा विरह. या आधी आलेले चढ उतार, रागलोभ, रुसवे फुगवे दोघांनी मिळून एकमेकांना धिर देत निभावून नेलेले. कुठल्याही परिस्थीतीत एकमेकांना साथ द्यायची हे ठरवून अगदी तसंच वागलेलो. आताशा कुठे सगळं निट झालं. सेलिब्रेट करायला हवा होता हा आनंद पण तसा वेळच झाला नाही. सगळं सेलिब्रेशन गेलं एक महिन्यावर! मग एका स्वप्नासाठी दुस-या स्वप्नाला लांबणीवर टाकत निघालो, गाडीने नागपूर स्टेशन अलगद मागे टाकलं, तसं.

पहाटे पाच नंतर झोप लागली आणि सकाळी आठ वाजता जाग. एव्हाना आंध्रप्रदेशात आलो होतो. म्हणजे तेलंगणात. खुपसा विदर्भासारखाच आहे हा भाग  असं विक्रम रेड्डीने सांगीतल्याचं स्मरणात होतं. ते खरं आहे. झाडाच्या, मातिच्या रंगापासुन ते अंगाला लागणा-या वा-यापर्यंत सगळं आपलंसं वाटावं असं आहे ईथे. धानाची शेती, हिरवळ आणि शेततळी. डोळ्यात भरावं ईतकं वैभव आंध्राच्या शेतीमध्ये आहे. तरीही ईथला शेतकरी विदर्भाच्याच शेतक-यासारखा दुःखी आहे. ईथेही वेगळ्या राज्यासाठी कित्येक वर्षापासुन आंदोलनं सुरू आहेत. ईथेही एका भागाकडे दुर्लक्ष केलेलं आहे, त्या भागावर अन्याय केला आहे. आपल्याकडे नाईक, पाटिल आहेत, आणि ईकडे रेड्डी! आपल्याकडेही सामान्यांना चेहरा नाही, आणि ईकडेही. शेवटी भारतातच आहोत आपण, दुस-या देशात नाही ही खात्री ईथे येउन पटली.

तिरूपतीला गाडी थांबली तेव्हा खाली उतरून या पावन नगरालाच वंदन करून आलो. बालाजीचा डोंगर दुरून दिसतो. व्यंक़टेश्वराचे तेवढेही दर्शन पुरेसे. लहान असतांना रांगेत उभे राहून दिवसभराच्या प्रतिक्षेनंतर व्यंकटेशाचे सोन्याने मढलेले रूप चारेक सेकंदांपर्यंत पाहिल्याच आठवते. तिरूपती म्हटलं की सामान्यांच्या दृष्टीने जवळचा असा श्रीमंतीचा विषय तर निघालाच पाहिजे. तसा तो गाडीत बसल्यावर चर्चेला आला. हल्ली लोकांकडे काळा पैसा खुप झालेला आहे, म्हणुन आपले पाप देवाने पचवावे या उद्देशाने लोक पैसा दान करतात. भ्रष्ट मार्गाने पैसे मिळवणा-यांना येणारा गिल्टी फिल, किंवा असुरक्षिततेची भावना कोट्यावधीचं दान करायला भाग पडते वगैरे चर्चा रंगल्या.

रात्री कधीतरी आयडिया मोबाईल्सचा एक मॅसॅज आला. कि वेलकम टू तामिल नाडू! झोपेतच तो मॅसॅज पाहिला आणि दुर्लक्ष केलं. पहाटेच्या सुमारास पुन्हा मोबाईल वाजला. मॅसॅज असणार. आणि तो ही कंपनीचाच. कारण सरकारने आता मॅसॅजॅस वर बंदी आणलेली आहे. त्यामुळे मित्रांचे, ऑफीसमधल्या कलिग्सचे, किंवा 'तीचे' मॅसॅजेस येणं दुरापास्तच. तरीही ती पाच मॅसॅजेस पाठवते. अगदी पूरवून पुरवून! कसली विचित्र परिक्षा आहे ना ही? एकाच गावात असतांनादेखील दिवसभरात शे-दिडशे मॅसॅजेस पाठवणारे आम्ही, आणि आता ईतके दूर असुन साधे पाच मॅसॅजही पाठवू शकत नाही!

अंदाजाप्रमाणे मॅसॅज कंपनीचाच होता. केरळ आल्याचं सांगणारा संदेश. पण मॅसॅज वाचण्याच्या आधीच बाहेर दिसणारी नारळाची झाडं आणि अगदी नव्याको-या छायाचित्रात चमकून दिसेल अशी हिरवळ पाहूनच आपण केरळमध्ये आल्याचं कळलं. सोनेरी ऊन म्हणजे काय ह्याचा सगळ्यात सोनेरी प्रत्यय यावा असं ठीक़ाण म्हणजे केरळ! गॉडस ओन कंट्री -- म्हणजे प्रत्यक्ष देवाचंच स्वामित्त्व असणारा प्रदेश असं त्याला म्हट्लंय ते उगाच नाही. अगदी निसर्गचित्रांमध्ये लहान मुलांनी काढावे तसे रस्ते, वनराई, नदी, नाले, आणि शेती प्रत्यक्षात पहायला मिळते ती या प्रदेशात. घराचा मागचा दरवाजा अगदी तलावातच उघडतो, हे बघतांना आश्चर्यही वाटतं आणि थोडं विचित्रही. केरळमधल्या शेतातही मोठमोठी शेततळी आहेत. ईथल्या शेतातल्या झोपड्या, किंवा कौलारू घरं खुप नवीकोरी वाटतात. कदाचित नुकत्याच आलेल्या पावसात धुवून निघाली असतील म्हणुन असेल. सगळंकाही नवं दिसतं, चकाकणारं. ट्रेनच्या अगदी समांतर जाणारा रस्ता, कौलारू घरांच्या अगदीच जवळून जाणारी रेल्वेगाडी, आणि फाटक नसतांनाही रेल्वेगाडीसाठी शिस्तीत थांबलेले लोक; अशी  अनेक दृष्य़ं या प्रवासात डोळ्याने हेरली.

दहाच्या सुमारास एर्नाकुलम स्टेशनवर गाडी थांबली आणि रेल्वे स्टेशन सगळीकडचे सारखेच, असा अनुभव घेत पुढं निघालो.  स्टेशनच्या मुख्य़ द्वारावरच स्वागतासाठी उभे होते भारतीय जलसेनेचे जवान. पांढ-याशुभ्र पोषाखात पांढ-याच गाड्या घेऊन उभे असलेले नेव्हीचे जवान आम्हाला घेऊन आमच्या मुक्कामी  म्हणजे हॉटेल ट्रीडेन्ट् येथे आम्हाला घेऊन आले. सगळ्यांशी अनौपचारिक  ओळख झाली. ज्या खोलीत येता आठवडाभर रहायचे आहे ती खोली, ते हॉटेल पाहून झाले. केरळचे निसर्गसौंदर्य भरभरून दिसावे याची पुर्ण काळजी येथे हॉटेलच्या ईंटेरिअर डेकोरेटर आणि आर्कीटेक्टने घेतलेली आहे. आज संध्याकाळी हॉटेलच्या कॉन्फरन्स रूममध्येच सर्व सहका-यांची आणि कोर्सच्या मुख्य कार्यवाहांची औपचारिक ओळख होइल. त्यानंतर उद्यापासुन ख-या अर्थाने कोर्सची सुरूवात.

4.7.12

गुरूजी, मास्तर, सर आणि जगतगुरू....


गुरूजी...
दातीर गुरूजी आता रिटायर्ड झाले आहेत. दारव्ह्याच्या नगरपरिषद शाळा क्रमांक दोनच्या मागे काही किलोमिटर चालत गेल्यावर लागणा-या त्यांच्या छोट्याश्या शेतात आता ते त्यांचा पूर्ण वेळ देत असतील. या शेतात लावलेली गाजरं उपटून बैलांनी चालवलेल्या मोटेच्या पाण्याच्या धारेवर धूवून आम्ही खात असू. दोन ते तीन या एक तासभराच्या सुटीत गुरूजींनी शेतावर घेवून जावं, म्हणुन त्यांच्या मागे लागत असु. कधीमधी गुरूजीं आमचा हा हट्ट पुरा करायचे, आणि मग  आम्हा काही खास विद्यार्थ्यांची मज्जा व्हायची. पहिली ते चौथीचे माझे गुरूजी -- दातीर गुरूजी!

'माझी शाळा' हा निबंध लिहत असतांना वर्गात मला 'श्री दातीर गुरूजी' शिकवतात, या वाक्यातलं गुरूजींचं नाव मोठं, रंगीत लेखणीने गीरवून लीहायची स्पर्धाच आम्हा वर्गमित्रांमध्ये लागलेली असायची. गुरूजी ईतके आवडायचे. त्यांच्यापेक्षा हूशार, त्यांच्यापेक्षा मोठ्ठा कुणी नव्हताच जगात. ते कोणत्याही प्रश्नाचं उत्तर  अगदी क्षणार्धात देऊ शकतात. कुठलंही गणित लिलया सोडवू शकतात. अगदी काहीही करू शकतात असा आमचा पक्का विश्वास होता. एकदा तर मी त्यांच्या हाती पाटी-लेखण दिली आणि म्हटलं की भारताचा नकाशा काढून द्या!

चौथीची परिक्षा झाली आणि दारव्हा गावच सोडावं लागलं. मग शाळाही. गुरूजींना भेटणं त्यानंतर कधी शक्यच झालं नाही. आयुष्यात काहीतरी बनून दाखवायचं, आणि मगच त्यांच्यापुढे जायचं असं ठरवलं होतं. अजुन ती वेळ यायचीय. पाऊस आलाय. आता गुरूजी शेतावर काहीतरी काम करत बसलेले  असतील. मोटेच्या जागी मोटर लावलेली  असेल. गाजर असतील की नाही आता? परत जायला पाहिजे दारव्ह्याला.
.......

मास्तर...

पुरोहितसर स्वतःचा उल्लेख 'पुरोहित मास्तर' असाच करतात. त्यांना सर वगैरे पेक्षा मास्तर म्हटलेलंच रूचत असावं. माझ्या बाबांना त्यांच्या शाळेत खो-खो शिकवणारे पुरोहित सर मी आठव्या वर्गात गेल्यावर मला ईंग्रजी आणि गणित शिकवतील असं बाबांना कदाचितच वाटलं असेल. पण मलाच काय? माझ्यानंतरच्या बारा बॅचॅसला ईंग्रजी शिकवून पुरोहित मास्तर अजुनही, वयाच्या ऐंशिच्या घरात, अगदी मजेत वावरत असतात. माझ्यासारख्या शेकडो हजारो विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा आणि प्रार्थनांचाच हा परिणाम असावा.

मी आठवी-नववीत होतो, तेव्हा ते नऊ बॅचॅस घ्यायचे. कधीकधी त्याहूनही जरा जास्त. सकाळी पावणेसहा वाजताची पहिली बॅच! आता वयोमानाप्रमाणे तीनच बॅचॅस घेतात. पण मुलांना ईंग्रजी शिकवणं हीच त्यांना जगण्याचं बळ देणारी उर्जा असावी.

पुरोहित सर जुन्या पद्धतीच्या व्याकरणप्रधान, किंग्ज ईंग्लीशचे पुरस्कर्ते. काळ, क्रियापदाच्या, डायरेक्ट-ईनडायरेक्ट स्पीच च्या चुका झाल्या, क्लॉज जोडतांना काहीतरी चुक झाली की अगदी खोखोच्या मैदानावरच्यासारख्या परमोच्च आवाजात शिव्यांची लाखोळी वाहतांना सरांना कित्येकदा अनुभवलं आहे. आजच्या ट्युशनमध्ये मला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आलंच पाहिजे, ही जीद्द त्यांनी आपोआपच मनात भरवली. ईंग्रजी आपल्याला वाटते तेवढी कठीण मुळीच नाही, ती सहज जमणारी, नियमात बसणारी भाषा  आहे असं त्यांच्याच शिकवण्यातून वाटून गेलं. नंतर ईंग्रजी पत्रकारितेत आल्यावर पुरोहित सरांच्या व्याकरणाची गरज पदोपदी भासु लागली, तेव्हा वाटलं की पुन्हा एकदा पुरोहितसरांच्या बॅचमध्ये जाऊन बसावं. क्रियापदं, काळ, आणि क्लॉज शिकावे. आपल्याला आता त्याची खरी गरज आहे. होईल का कधीतरी शक्य? बघुया!
......

सर

प्रसन्न देशपांडे सर सध्या पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये ईंग्रजी शिकवतात. यवतमाळचा, आमच्या दाते कॉलेजमध्ये शिकलेला, मग अमरावतीला विदर्भ महाविद्यालयात एम ए केलेला मुलगा, पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक झालाय.  अख्ख्या यवतमाळचा  उर अभिमानानं भरून यावा असं हे यश! 'प्रसन्न सर' म्हणजे आडनावाच्या नव्हे, तर नावाच्या समोर 'सर' लावून आवाज देता येणारं पहिलं व्यक्तिमत्त्व. वयात जास्तीत जास्त दहा वर्षाचं अंतर असेल. ईंग्रजीचा अभ्यास स्वतःहून कसा करायचा हे प्रसन्न सरांनी स्वतःच्याच उदाहरणातून दाखवून दिलं. ऑक्टॉबर ते फेब्रुवारी आमच्या ट्युशन्स घ्यायच्या, पैसा जमा करायचा, आणि मार्च ते ऑक्टॉबर पुण्याला राहून नेट-सेट चा, पि एच डी चा अभ्यास करायचा, हा पायंडा प्रसन्न सरांनी पाच वर्ष जपला. फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांची निवड झाली तेव्हा कोण आनंद झाला होता म्हणुन सांगु आम्हा सगळ्यांना! अगदी सगळ्याच्या सगळ्यांनी ठरवलं होतं, की प्रसन्न सरांच्या पावलावर पाऊल ठेवून विदर्भ महाविद्यालय अमरावतीला प्रवेश घ्यायचा आणि आपणही असंच काहीसं यश मिळवून दाखवायचं! अनेकांनी ते केलंही, पण कुणालाच जमलं नाही नंतर. शेवटी प्रसन्न देशपांडे होणं ही काही खायची गोष्ट नाही.

प्रसन्न सरांसारखा ईंग्रजीचा साहित्यीकदृष्ट्या, एक ललितवाग्मयाची भाषा म्हणुन केलेला अभ्यास मनाला खुप भावून गेला. ईंग्रजीत आपल्यालाही लिहता येऊ शकतं, कवीता सुचू शकतात, हे सगळं त्यांच्याच सहवासात उमगलं. आज त्या ईंग्रजीत लिहूनच आयुष्याची गाडी सुरू ठेवू शकत आहे. एखादी बातमी झकास झाली, ब्लॉगपोस्ट स्वतःच्याच मनाला भावली, की असं वाटतं की प्रसन्न सरांनी ती वाचावी! आपल्याला काहितरी सांगावं -- एखादी शेलीची, किटसची गोष्ट; ओ हेन्रीच्या शॉर्ट स्टोरिजच्या मागची लॉंग स्टोरी; वर्डस्वर्थ आणि कोलरिजच्या लेक डिस्ट्रीकचं निसर्गसौंदर्य!!
आजवर सगळं लिहलेलं, सर, तुमच्यासाठी घेऊन यायचं आहे. तुम्ही ते वाचता वाचता या सगळ्या गोष्टी आपल्या शैलीत शेअर कराव्या, तुमच्या कडून ऐकतांना परत एकदा ते मंतरलेले दिवस अनुभवावे असं वाटतं. बघू कधी जमतंय़ ते.
......

जगतगुरू...

माउली महावैष्णव संतश्रेष्ठ जगदगुरू श्री तुकोब्बाराय महाराज -- वारकरिकिर्तनाचे भिष्म पितामह श्री बाबामहाराज सातारकर यांच्या ओजस्वी वाणीतून तुकोबांचा असा उल्लेख ऐकला तेव्हापासुन तो कायमचा मनावर कोरल्या गेलेला. नुकताच त्यांच्यावरचा चित्रपटही पाहिला - तुकाराम. शिर्षकही अगदी विचार करून ठेवलेलं. जाणून बुजून संत हे बिरूद काढून फक्त 'तुकाराम' ठेवून दिग्दर्शकाने तुकोबांचा ह्युमन ऍगल यात जपलाय. 

आयुष्यच माणसाला कसं शिकवत, घडवत जातं हे त्यात दिसतं. आयुष्याने दिलेली संकटं, चांगले-वाईट अनुभव आणि विठ्ठलावर असलेली अगाध श्रद्धा यांच्या जोरावर तुकाराम जगदगुरू झाले. आपल्या दैनंदिन जीवनातले कार्यकलाप पुर्ण करून, 'कष्ट करता करता करा देवाचं भजन' या सुत्राचा अबलंब करून देवपद प्राप्त केलेले तुकाराम महाराज अभ्यासक, वाचक, तत्त्वज्ञानी, कवी, दार्शनिक, समाजसुधारक, बुद्धीप्रामाण्यवादी, पुरोगामी आणि  आणखीही बरंच काही होते.
'उच निच काही नेणें भगवंत' हा १३ पदांचा अभंग.. पण अवघ्या वेद पुराण आणि महाकाव्यांचे संदर्भ त्यात येतात. म्हणजेच तुकोबांनी या सगळ्या वाग्मयाचा अभ्यास केलेला असेल. थोडक्यात भक्ती करत बसणे म्हणजे निवळ 'पांडुरंग पांडुरंग' च करत राहणे नव्हे, तर अभ्यास, मनन, चिंतन आणि आत्मसाक्षात्कार आहे, हे त्यांच्या आयुष्यातुन त्यांनी दाखवून दिलं.

.............

दातीर गुरूजी आज दारव्ह्याला आहेत. पुरोहित मास्तर यवतमाळला. प्रसन्न सर पुण्याला आहेत. या तिघांना भेटणं तुर्तास तरी शक्य नाही. जगदगुरू तुकोबाराय मात्र जवळच आहेत. त्यांच्या अभंग अस्तीत्त्वासह.

.

28.6.12

वारीत चाललो मी...


सध्या वारीच्या फोटोंनी फेसबुकच्या भिंती, वृत्तपत्राची पानं, आणि भावीकांची मनं भरून गेलेली आहेत. आषाढी एकादशी -- महाराष्ट्राचा राष्ट्रीय लोकोत्सव अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय. वारीतील उभे रिंगण, गोल रिंगण, माउलींच्या पालखीबरोबर टाळ-मृदंगाच्या गजरात चालणारे हजारो भावीक, मानाचा  अश्व, तुळशीवृंदावनं डोक्यावर घेऊन झपझप चालणा-या लाल-केशरी लुगड्यातल्या स्त्रीया, पताका, टाळ मृदंग घेऊन 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या गजरात तालबद्धरित्या पुढे जाणारे पांढ-या कपड्यातले वारकरी, भजन, किर्तन, नामाचा गजर, आणि अवघ्या वातावरणात भरलेला पांडूरंग! वारीची जादू पंढरपूरपासुन अगदी शेकडो किलोमिटर दूरही जाणवतेय ईतकी वारी महाराष्ट्राच्या, आपल्या मराठी जनमनाचा अविभाज्य भाग झालेली आहे.

आळंदी आणि देहू येथून येणा-या माऊलींच्या दोन महत्त्वाच्या पालख्या, शिवाय अगदी शेकडो खेड्यांपाड्यांतुन येणारी भावीकांची रिघ, अगदी आंध्रप्रदेश, कर्नाटकातूनही येणा-या वा-या, वारीच्या उत्साहाचा अभ्यास आणि अनुभव करण्यासाठी जगभरातून वारीत सामील होणारे लोक, हे सगळं पाहिलं, वाचलं, की पुढच्या वर्षीची वारी आपणही करून यावी असं वाटून जातं. अनेक वर्षापासुन असं वाटत आलेलं आहे. अजुन मात्र वारीत जाण्याईतपत पुण्य खात्यावर जमा झालेलं नाही, असंच म्हणावं लागेल. पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेणं हे या आधीही अनेकदा केलंय. कमी गर्दीच्या दिवसांत अगदी तासाभरात दर्शन होवून बाहेर आल्यावर देवळाच्या सभामंडपात 'रूप पाहता लोचनी' म्हणणा-या वारक-यांच्या समुहाबरोबर उभं राहून टाळ्याही वाजवल्या आहेत. 'याची देही याची डोळा' विठठलाची मुर्ती पाहिलीअगदी पायांना हात लावून दर्शन घेतलं, गाभा-यात क्षणभर उभं राहून 'तुळशिहार गळा कासे पितांबर' असं ते रूप डोळ्यात भरून घेण्याचं सौभाग्यही उपभोगलंय. पण वारी करून केलेलं विठूरायाचं दर्शन अजुन नशिबात आलेलं नाही.

आषाढी एकादशीला पंढरपुरात अगदी लक्षावधी विठ्ठलभक्तांचा मेळा लागलेला असतो. दोन दोन दिवस रांगेत उभे राहण्यात जातात, आणि कधीतरी द्वादशिला, त्रयोदशिला दर्शन मिळतं, असं लोक सांगतात.  आषाढी एकादशीचा मुहुर्त साधण्यासाठी केलेला हा वारीचा अट्टहास, काही हजार भाविकांचाच पुर्ण होत असावा. ईतर लाखो लोक पंढरीचं, चंद्रभागेचं, कळसाचं किंवा जो देवळात दर्शन घेऊन आलाय, त्याचं दर्शन घेऊनच स्वतःला धन्य मानतात. मग ईतका मोठा व्याप, पायी चालण्याचे एवढे कष्ट, का म्हणून करायचे? बरं पायी निवळ चालत राहणं म्हणजेच वारी नव्हे! रिंगणामध्ये हाती असेल नसेल तेवढ्या जड-हलक्या वस्तू घेऊन धावावं लागतं! माउलींची पालखी विसाव्याला खाली ठेवल्या शिवाय वारकरी खालीही बसत नाहीत!! वारक-यांची स्वतःची संघटना आहे, त्यांचे नियम, अटी आहेत, त्यांचं काटेकोरपणे पालन झालं पाहिजे!! कधीमधी अचानक ढग दाटून येतात, मुसळधार पाऊसही येतो!! तश्यातही चालत रहावं लागतं. वारी करणे म्हणजे काही गम्मत नाही. खेड्यापाड्यात बारा महिने अठरा काळ कष्टाची कामं करणारी भावीकमंडळीच हे दिव्य करू शकतात. एक मात्र खरं की वारीत कुणालाच थकवा येत नाही! अगदी साधे वारीचे फोटो पाहिले तरी आपल्याला आलेला शिणही कुठच्या कुठे पळून जाईल ईतकी ताकद त्यामध्ये  असते. पांडुरंग या काळात पंढरपूरच्या त्या देवळात नसतोच. तो तर वारीतच कुठेतरी चालत, नाचत, धावत असावा. हो! म्हणुनच रिंगणामध्ये धाव धाव धावूनही भावीक थकत नाहीत. शेकडो किलोमिटरचा प्रवास पायी चालत करूनही त्यांना शिण येत नाही. दर्शन होवो अथवा न होवो, त्यांना कसलीच पर्वा रहात नाही. वारीत चालतांना सगळ्यांची ओळख असण्याचीही गरज नसते. सगळेच माऊली! एकमेकांच्या पायांना हात लावून नमस्कार करायचा! सोशल नेटवर्कींगचा हा उच्चतम स्तर नव्हे का?

ईतका मोठा प्रवास निवळ चालत करत राहिलं तर किती निरस वाटलं असतं ना? म्हणुन मग रिंगण करण्याची कल्पना आली असावी. चालून चालून अंग अकडून जाऊ नये म्हणुन विठूनामाच्या तालावर भावीक पारंपारिक उड्या मारतात, पावलांची विषिष्ट पद्दतीने हालचाल करून नृत्य करतात, हे सगळे एरोबिक्सचे, रिलॅक्सेशनचे व्यायामप्रकारच नव्हेत का?

रात्रीच्या वेळी किर्तन होतं. किर्तनात आख्यानामध्ये भक्त-भगवंताची कथा रंगवली जाते. म्हणजे थोडक्यात गोष्ट सांगीतली जाते. गजर केला जातो. स्ट्रेस मॅनॅजमेन्टचा हा सर्वात सोप्पा आणि प्रभावी प्रकार नव्हे का? कॅंटरबरीच्या छोट्याश्या यात्रेत भाविकांनी एकमेकांना सांगीतलेल्या गोष्टीचं कॅंटरबरी टेल्स नावाचं जसं भलंमोठं अजरामर साहित्य निर्माण झालं, तसंच शेकडो वर्षांपासुन अविरत चाललेल्या वारीत संत-वारक-यांनी केलेल्या किर्तनांच्या आख्यायिका बनल्यात. संतांनी दुर्बोध वेद-पुराण आणि महाकाव्यांच्या सुबोध लोककथा बनवल्या. लोककथांतून लोकमानस बनलं. आणि त्यातून अवघा महाराष्ट्र घडला. व्हॅल्यु एज्युकेशन, मास अवेकनिंग, आणि लोकसहभागातून विकास वगैरेंच्या सा-या कल्पना अवघा महाराष्ट्र घडवणा-या या वारीपुढे थीट्या नाही का वाटत?

म्हणुन वारीत जाणं म्हणजेच विठ्ठलाला भेटणं! जीवन घडवणारी, मन प्रसन्न करणारी, वर्षभराच्या कष्टाच्या कामासाठी उर्जा देणारी वारी म्हणजेच विठठल होते. देवळात पुंडलीकानं भिरकावलेल्या विटेवर 'युगे अठठावीस' उभा असलेला विठठल वारीतल्या भावीकांनी ज्या जागी विट भिरकावली, त्याच जागी येऊन विटेवर उभा राहतो. सर्व भक्तांना पुंडलीक बनवणा-या या वारीच्या परंपरेलाच जोहार करावा! विठ्ठलापर्यंत तो आपोआपच पोचेल.


19.6.12

ये शिवाजी क्या सरदार था क्या?


ऍलन मॉर्डे तीसेक वर्षाचा आहे. जन्मापासुन आणि गेल्या कित्येक पिढ्यापासुन नागपूरचाच रहिवासी आहे. फ्रेन्डस कॉलनी मध्ये त्याचं पिढीजात घर आहे, आणि रामदासपेठमध्ये एक छोटासा फिटनेस स्टुडिओ चालवतो. गेल्या पाच सहा वर्षात नागपूरमधला अग्रगण्य फिजिकल ट्रेनर म्हणुन त्यानं नाव कमावलं आहे. फिटनेसबद्दलचा त्याचा अभ्यास अवाक करणारा आहे. ईंग्रजी गाणी, फिटनेसवरची पुस्तकं, घरी पाळलेली सहा सात वेगवेगळ्या जातीची कुत्री, त्यांची काळजी घेण्याच्या टिप्स, फेसबुक, या सगळ्यांमध्ये रमणारा, आणि रोज शेकडो प्रकारच्या शेकडो लोकांना भेटणारा ऍलन. माझ्या सेलफोनमधील छत्रपती शिवाजीमहाराजांचा वॉलपेपर पाहून 'यार ये शिवाजी क्या सरदार था क्या?' असं तो विचारेल, असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. 

सुरूवातीला जरा धक्काच बसला. 'सरदार?'. आधी वाटलं की आदिलशहा, निजामशहाचा सरदार, किंवा मराठ्यांच्या मावळातील 'सरदार-उमराव' या अर्थाने त्याने 'सरदार' म्हटले असेल. पण तसं नव्हतंच. 'सरदार' म्हणजे पंजाबी, शिख योद्धा या अर्थाने त्याने विचारलं होतं. 'सरदार नही. मराठा थे!,' मी त्याला सांगीतलं. थोडं रागातच. 'काय मुर्ख माणूस आहे? एवढंही नाही माहिती?!'

'पर सरदार लोग ऐसे तलवार वगैरा ले के रहते है ना. और दाढि भी...' त्याने आपला तर्क सांगीतला. मला आणखी एक आश्चर्याचा धक्का. कमाल आहे! मग माझ्यातला मराठी माणूस जागा झाला.
महाराजांच्या दाढी राखण्यामागचं रहस्य, जगात ते झाले त्यामुळेच आज मी हिंदू आणि  ऍलन ख्रिश्चन म्हणुन राहतो आहोत नाहीतर सरसकट सगळे मुसलमान झालो असतो, ही आणि ईतर सगळी गोष्ट, जीतकी सहज करून सांगता येईल तीतकी त्याला सांगीतली. तो मन लावून ऐकत होता. आपण हे कधीतरी शाळेत वगैरे वाचलंय हे त्याला पुसटसं आठवत असावं. पण बहुतेक करून सगळं त्याच्यासाठी नवीनच होतं. त्याला बाय करून निघतांना माझ्या मनात आलं, की याच्यासारखे किती असतील?

ऍलन बावळट मुळीच नाही. तो अशिक्षीतही नाही. आपल्या क्षेत्राचं त्याचं ज्ञान अफाट आहे. आपल्या धर्माचंही असेल. आहेच. म्हणुनच त्याने त्याच्या स्टुडिओमध्ये एक मोठा क्रॉस लावला आहे. त्याखाली लीहलंय 'नो पेन, नो गेन'. क्रॉसचा वापर जीममध्ये ईतका कल्पकपणे करणा-या माणसाला शिवाजी महाराजांबद्दल जुजबी माहितीही नसावी? आश्चर्य अजुनही वाटतंय.

मी स्वतःचं लहानपण आठवलं. ख्रिसमसची सुटी असली, किंवा गुड फ्रायडेला सुटी असली, की आज नेमकी का म्हणुन सुटी आहे, हे माझ्या घरचे लोक मला समजावून सांगायचे. अगदी ईत्यंभूत. गुरूनानक जयंतीच्या दिवशी कुणाचा जन्म झाला होता? गुरू नानक कसे महान होते, हे देखील आईने त्यांच्या गोष्टी सांगुन समजावलं आहे. ईदच्या दिवशी चंद्राचं महत्त्व, "ती बघ ईदेची चंद्रकोर" अगदी गच्चीवर नेऊन 'चांद-तारा' दाखवत बाबांनी मला समजावल्याचं आठवतं. प्रेषित पैगंबरापासुन ते करबलापर्यंतच्या गोष्टी मामाने सांगीतल्या आहेत. भगवान बुद्ध असो किंवा वर्धमान महावीर तर दूस-या कुठल्या धर्माचे नसुन आपलेच संत असल्यागत त्यांचं चरित्र शिकवण्यात आलं. येशुख्रिस्तावरची एक सिरिअल मधल्या काळात दुरदर्शवर यायची. त्यातली तर गाणी मी पाठ केली होती. जसे आपले देव आहेत, तसेच ते देखील देव आहेत, असाच संस्कार मनावर झालेला. ही चरित्रं अभ्यासक्रमातही नंतर कधीतरी कुठेतरी ओझरती आलेली. पण घरी सांगीतलेल्या गोष्टींमुळे हा  अभ्यासही मग सोपा झाला होता. माझ्यासारख्याच अनेकांचा अनुभवही असाच असेल.

मग ऍलन मॉर्डेला नसेल सांगीतलं का त्याच्या आईबाबांनी शिवाजी महाराजांबद्दल? कदाचित नसेल सांगीतलं. केवळ तो ख्रिश्चन आहे म्हणुन नाही. तर मुळातच अनेकांना आपल्या कामाची गोष्ट नाही मग सांगुन काय करायची, किंवा मग माहिती करून काय फायदा? असं वाटतं. म्हणुन. त्याला त्याच्या फिटनेसच्या क्षेत्रातलं अद्ययावत ज्ञान देण्यासाठी त्याच्या मोठ्या भावानं कित्येक फिटनेस जर्नल्सचं नियमित सबस्क्रिप्शन घेतलं आहे. लहान भावाने 'ऍलन फिटनेस स्टुडिओ' नावाची फेसबुक कमुनिटी उघडून दिली आहे. कुत्र्यांवरची पुस्तकंही तो नियमित वाचत असतो.

हे सगळं त्याला उपजीवीकेचं साधन द्यायला पुरक ठरणार म्हणुन. पण शिवाजी महाराज त्याला माहिती नाहीत. भोसल्यांच्याच नागपूरात तो पिढ्यानपिढ्यापासुन राहतोय, पण भोसले कोण? हे तो सांगु शकणार नाही. चमकदार झेंडे घेऊन बॅण्ड वाजवत जाणा-या मुसलमान लोकांच्या समुहाला उर्स म्हणतात एवढं त्याला माहिती आहे,  पण हा उर्स का निघतोय? हे त्याला सांगता आणि समजताही येणार नाही. ऑक्टोबर महिन्यात दिक्षाभुमीवर गर्दी होते हे त्याला माहिती आहे, पण नक्की का? हे सांगता येत नाही. बडगे, मारबती, रामनवमीची शोभायात्रा, चेट्रीचंद, महावीर जयंती, अग्रसेन जयंती, महेश नवमी, बिरसा मुंडा जयंती, गुरू अर्जनदेवांचा बलिदान दिवस, हे सगळं आजुबाजुला घडत राहतं. ईतके वर्षापासुन. पण हे का घडतंय हे त्याला माहितीच नाहीय.

खरं सांगायचं तर हे एक एका दिवसाचे सण, उत्सव. पण प्रत्येकामध्ये एक एक संस्कृती, एक एक समाज, एक एक जीवनपद्धती दडलेली आहे. त्याचप्रमाणे शिवाजी महाराज असोत, किंवा भगवान महावीर असोत, किंवा बिरसा मुंडा असो, महाराणाप्रताप असो, सेंट झेविअर असो, किंवा राजा दाहिरसेन असो, या सगळ्या एक एक व्यक्ती  असल्या तरी त्यांच्यामध्ये एक  अवघा समाज, अवघी लोकपरंपरा दडलेली आहे. ह्या सगळ्यांबद्दल माहिती असणा-या मला त्याचा किती फायदा होईल किंवा होणारही नाही, हे अलाहिदा, पण या सगळ्यांपासुन अनभिज्ञ असणा-या ऍलन मोर्डेसारख्या लोकांचा नकळतपणे मोठा तोटा होतो आहे, हे नक्की.

सगळ्या धर्माच्या लोकपुरूषांबद्दल, भारतातल्या सर्व समाजांतील राष्ट्रपुरूषांबद्दल, सर्व धर्म-पंथांच्या वेगवेगळ्या परंपरांबद्दल ते आपल्यासारख्यांचेच, नव्हे आपलेच असल्याची खात्री देत मला अवगत करवणा-या माझ्या कुटुंबाचा मला अभिमान वाटून गेला. माझ्यासारखी माणसं भेटली असती, तर ऍलन एक चांगला ट्रेनर तर झालाच असता, शिवाय 'ये शिवाजी क्या सरदार था क्या?' असा प्रश्नही त्याच्या डोक्यात कधीच आला नसता.