वातावरणातला बदल एका दिवसात जाणवायला लागतो. धुपाचा, राळेचा सुगंध, आरतीच्या वेळी
होणा-या घंटानादाची किणकिण, शंखाचा धिरगंभीर
आवाज, आणि 'साचे दरबार की जय' चा तो चिरपरिचीत जयघोष -- आपोआपच या सर्व गोष्टी जाणवू लागतात आणि मन नव्या
उमेदिने भरून येऊ लागते. नवरात्रीचे नऊ दिवस सुरू झालेले असतात. कधी नव्हे ते उपास
करावेसे वाटतात. आंघोळ केल्याशिवाय घराच्या बाहेर पडण्याची ईच्छाच होत नाही.
वातावरणात पसरलेला धुपाचा मंद सुगंध आत अगदी हृदयापर्यंत पसरल्याची जाणीव होत
राहते. आपणही या नऊ दिवसात अंतर्बाह्य बदलून गेल्याचीच जाणीव! आदिशक्तीचं पर्व
म्हणतात ते यामुळेच. आपल्या हृदयाला धडधडण्याची प्रेरणा देणा-या, या ब्रम्हांडात जीव भरणा-या एका मुलशक्तीच्या पुजनाचे हे नऊ दिवस.
आपल्याला विश्वाची निर्मीती वगैरे मोठमोठ्या गोष्टीत जायचेच नाही.
वैष्णवदेवीच्या नुकत्याच केलेल्या यात्रेत झालेली अनुभुतीच देवी दाखवायला सक्षम
आहे. धड दोन किलोमिटर चालण्याची सवय नसलेले आम्ही पंधरा लोक चौदा किलोमिटरचा डोंगर
चढत वरपर्यंत पोचलो. वैष्णोदेवीचा डोंगर चढतांना थकवाच येत नाही, वगैरे गोष्टी ऐकल्या होत्या. त्या सपशेल खोट्या असल्याचा प्रत्यय आला तो खरंच
डोंगर चढून गेल्यावर. पायात मोठमोठे गोळे आलेले आणि जागचं हलावंसंही वाटेना ईतका
जास्त थकवा. पण तरीही पुढे चालत राहिलो. कसेकाय?
वरच्या गुहेमध्ये पाचेक सेकंदांपर्यत झालेलं देवीच्या तीन पिंडांचं दर्शन
म्हणजे वैष्णोदेवी नव्हेच! वैष्णोदेवी चौदा किलोमिटरचा पहाड चढण्याची उमेद आहे.
हसत हसत काठी टेकवत पुढे जाणारी ती म्हातारीही वैष्णोदेवी आहे. अनवाणी पायांनी गड
चढणारी ती मुलगी, पाठीवर मुलीला
बांधून 'जय माता दि' म्हणणारी ती आई, आणि खांद्यावर
मुलाला बसवून 'प्रेम से बोलो' म्हणायला लावणारे ते बाबा... वैष्णोदेवी तीथे भेटते. गड चढून झाल्यावर
त्याहीपेक्षा वर असलेल्या भैरवबाबांच्या मंदिरात जाण्याची सहज येणारी उमेद म्हणजे
वैष्णोदेवी आहे. उतरतांना सहज ओठावरती येणारे भजन म्हणजे वैष्णोदेवी आहे. खाली
उतरल्यावर आपल्या बसमध्ये परत बसतांना ढगाच्या आड कुठेतरी लपलेल्या दरबाराकडे नजर
टाकून 'आपण त्या ढगाच्या आत
जाऊन आलो!' हा विचार केल्यावर
चेह-यावर येणारं हास्य म्हणजे वैष्णोदेवी! 'आपणही करून दाखवलं' आणि 'आपल्यातही शक्ती आहे' ही अनुभुती म्हणजे वैष्णोदेवी आणि आणि उतरल्यानंतर पायांचा भुगा झालेला असुनही 'पुन्हा एकदा यावंच
लागते!' अशी ईच्छा मनात
राहणे, म्हणजे वैष्णोदेवी
आहे.
चराचरात व्यापलेल्या शक्तीचा अंश आपल्यातही आहे याची प्रचिती आली, म्हणजे सार्थक झालं की नऊ दिवसांचं. म्हणुनच आपल्या शरीर आणि मनाला आव्हान
देऊन ही प्रचिती घेण्यासाठी कठीण व्रतवैकल्ये आणि उपासांची परंपरा सुरू झाली
असणार. देवीच्या या नऊ दिवसांमध्ये आजवर वाचून ऐकून आणि समजुन घेतल्यावर उमगलेली
देवीची नऊ रूपं मला कळली तशी मांडण्याचा विचार केला आहे. बघूया कसं जमतंय ते.
"दिलों में ख्वाबों की बिजलियां लेके चल रहे हो तो ज़िन्दा हो तुम....." यहीं बिजलियां और यही ज़िन्दगी म्हणजे वैष्णोदेवी.....!!!
ReplyDelete