15.1.11

शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांना ऐकल्यावर...

मकरसंक्रंतीच्या शुभमुहुर्तावर शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरेंना ऐकायला मिळावं हे केवढं मोठं भाग्य! 'राजा शिवछत्रपती' नव्याने वाचायला घेतलं आहे, आणि सुरवातीलाच प्रत्यक्ष शिवशाहिरांचं दर्शन व्हावं हा मणीकांचन योगच नव्हे का! पत्रकारीतेच्या नोकरीमध्ये आजच्यासारखा योग जुळून आला की करतोय त्या धडपडीचं सोनं होतंय अशी खात्री पटते. निमित्त होतं एका पुस्तकाच्या प्रकाशनाचं. प्रा. विष्णु घनश्याम देशपांडे. उर्फ ‘महाराज’ यांच्या कार्याचा गौरव करणारा एक ग्रंथ 'तेजाळल्या स्नेहज्योती' हा त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नागपूरच्या श्री मंगेश प्रकाशन ने प्रकाशित केला. विघची सुन डॉ. सौ रंजना ह्यांनीच हा ग्रंथ लिहलाय. लिहलाय म्हणण्यापेक्षा संपादित केलाय असं म्हणणं जास्त योग्य राहिल, कारण यात अनेकांचे 'महाराजां'च्या सहवासातले अनुभव आहेत, अनेकांच्या आठवणी आहेत, प्रत्यक्ष महाराजांची भाषणं आहेत. आणि बरंच काही. हिंदू महासभेचे नेते, शिवाय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म – नव्हे -- भारतीय संस्कृती, आणि भारतीय राष्ट्रवादाचा पुरस्कार करणारे एक अभ्यासु नेतृत्त्व ‘महाराजां’नी देशाला दिले. त्यामुळे त्यांच्यावरील गौरवग्रंथाच्या प्रकाशनाला बाबासाहेब पुरंदरेंसारखा तपस्वी आवर्जुन उपस्थीत राहिला.

तो काळच वेगळा होता असं म्हणावं लागेल. नागपूरचा, त्याहीपेक्षा मंगळवेढा नावाच्या एका छोट्याश्या गावात राहणारा एक माणूस देशपातळीवर नेतृत्त्व करतो, विदिशा, गुणा, ग्वाल्हेरसारख्या नागपूरपासून कोसो दूर असलेल्या मतदारसंघातून लोकसभेच्या निवडणूका लढवतो, आणि निवडूनही येतो, हे सगळं आजच्या काळात अविश्वसनियच. मुळात महाराज अर्थात विष्णू घनश्याम देशपांडे हे नाव मला देखील या आधी माहिती नव्हतं. मुळचे नागपूरचे असलेले देशपांडे गुणा येथून पाच वर्षे खासदार होते, त्यानंतर पदविधर मतदारसंघातून महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेवर निवडून गेले वगैरे माहिती आजच मिळाली. मुळात कधी ही माहिती मिळवण्याचा प्रयत्नही केला नाही, आणि कुणी सांगण्याची तसदीही घेतली नव्हती. मात्र आज या माणसाचं कतृत्त्व ऐकलं, आणि आपलंही आडणाव देशपांडे असल्याचा अभिमान वाटला. पुस्तक अजुन वाचलेलं नाही, वाचीन तेव्हा त्यावर लिहीन. तुर्तास आजच्या प्रकाशनसमारंभाबद्दल...

बाबासाहेब पुरंदरेंच्यां हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं. सोबत प्रमुख वक्ते म्हणून हभप चारूदत्त आफळे होते तर कार्यक्रमाचं अध्यक्षपद भुषवलं होतं ते विक्रम सावरकर यांनी. तीघांना ऐकण्यासाठी ईतके लोक आले होते, की कधी नव्हे ते सायंटीफीक सोसायटीच्या हॉलमध्ये 'उभे राहून' लोकांनी ही भाषणं ऐकली. बाबासाहेब पुरंदरेंना ऐकण्याची उत्सुकता नक्कीच जास्त होती. सार्थ होती. स्वरवाहिनी अर्थात व्होकल कॉर्डवर ताण देऊ नका, अन्यथा ती फुटूही शकते, असा सल्ला डॉक्टरांनी दिल्यानंतरही बाबासाहेब पुरंदरे बोलले. भरभरून बोलले. मनापासून.

त्यांच्याआधी बोललेल्या चारूदत्त आफळे गुरूजींनी आपल्या प्रमुख भाषणातून महाराजांच्या अनेक आठवणी सांगीतल्या आणि या व्यक्तीमत्त्वाची ओळख करून दिली. 'एक किर्तनकार या नात्याने या राष्ट्रपुरूषाचं आख्यान मी आपल्यापुढे मांडलं" असं नम्रपणे नमुद करतांनाच आफळे गुरूजींनी आज हिंदुस्तानातच हिंदू समाज कुचंबणा का सहन करतोय, याचं सुरेख विवेचनही केलं. "धर्मांतरणं होतात, यात ख्रिश्चन मिशनर्र्यांचा धूर्तपणा हे जितकं महत्त्वाचं कारण आहे, तीतकंच महत्त्वाचं कारण आहे हिंदू धर्मगुरूंची धर्मकार्यामार्फत केल्या जाणार्र्या समाजकार्याप्रती अनास्था! चर्चकडे पैसा आहे, आणि ते कोट्यावधी डॉलर्स भारतातील गरीब आदिवासिंच्या धर्मांतरणासाठी खर्च करतात. पण आपली श्रीक्षेत्रेही काही कमी श्रीमंत नाहीत. पैसा आपल्याकडेही आहे. आई तुळजाभवानीला नवरात्रीच्या नऊ दिवसांत दहा हजार साड्या आल्या, असं तुळजापूर संस्थानच मोठ्या अभिमानाने जाहिर करतं. मग या दहा हजार साड्यांपैकी पाच-पन्नास मेळघाटातल्या आदिवासिंसाठी का नाही पाठवत? लोक सदगुरू साईबाबांना बत्तीस कोटींचं सुवर्णासन देतात, पण चार पाच लाख रूपये आश्रमशाळा चालवणार्र्या हिंदू सेवाभावी संस्थांना का देत नाहीत? तिरूपती देवस्थानाचे खांबही सोन्याचा मुलामा चढवून ठेवलेले आहेत. तरीही भक्त तीथे सुवर्ण दान देतात. द्यावं. भक्ती आहे, भावना आहेत. मात्र एक कोटीचं सोनं देवाला देऊन झाल्यावर निदान एक लाख रूपये तर हिंदू समाजाच्या उत्थानासाठी खर्च करायला हवे की नको? मात्र आपले धर्मगुरू -- शंकराचार्य -- या बाबतीत उदासिन आहेत. त्यांनी सुचवलं, की देवावर खर्च करता, तसाच समाजावरही करा, तर नक्कीच देणारे हात वाढतील, आणि हिंदू सेवाभावी संस्थांचंही बळ वाढेल. धर्मांतरणाला रोखता येइल!" असा विचार आफळेबुवांनी मांडला. आपल्या ओघवत्या शैलीत त्यांनी बौद्धीक सुमारिकरणाचा विषयही मांडला. "ज्ञान तर दूरची गोष्ट, हल्ली माहितीही नसते, आणि ती मिळवण्याचा प्रयत्नही नसतो." भारत देशाच्या हजारो वर्षाच्या देदिप्यमान ईतीहासाप्रती आपल्या मनात असलेली अनास्था आपल्याला घेऊन बुडणार की काय ईतकी भयंकर वाढलेली आहे. एक तर खरा ईतीहास मोडीत काढून खोटा ईतीहास सांगणं सुरू आहे. एनसिईआरटी पासून ते सीआयईटी पर्यंत सगळ्यांनी हिंदूराष्ट्र असलेल्या भारताच्या ईतीहासातून हिंदुत्त्वच मिटवण्याची शपथ घेतली आहे. अश्या या वाळवंटात खरा ईतीहास सांगणारी हिरवळ असं हे पुस्तक असल्याचं आफळेबुवांनी सांगीतलं.

आफळेबुवांच्या भाषणातीलच मुद्दा उचलत बाबासाहेब पुरंदरेंनी बोलायला सुरूवात केली ती 'सा मां पातू सरस्वती भगवती!' या ओळीने. "सध्या देशापुढे तीन बिकट समस्या उभ्या आहेत -- जातीयवाद, चंगळवाद आणि दहशतवाद. आणि या सगळ्यांना पोषक ठरत आहे ते म्हणजे अज्ञान! आपण अज्ञान जपतो, आणि म्हणूनच चंगळवादाकडे वळतो. आपल्यात धर्माबद्दल अभिमान कमी आणि जातींबद्दल अढीच जास्त आहे. परकियांकडून सहाय्य घेऊन दहशतवाद आता आपल्या घरापर्यंत पोचलाय आणि आपण महासत्ता बनण्याची स्वप्न बघत झोपा काढतोय. आपण शिवाजी महाराज वाचतो, सुभाषचंद्र बोस वाचतो, सावरकर वाचतो आणि म्हणतो की वा! काय देशभक्ती! केवढा त्याग! किती शौर्य! केवढी हिम्मत! आणि पुस्तक बाजूला ठेवून देतो. आपण स्वतःमध्ये कधी आणणार हे सगळे गुण किंचीत तरी? आपण कधी करणार थोडीतरी हिम्मत? आपण कधी दाखवणार जरासं धैर्य?" बाबासाहेब पुरंदरे बोलत होते. लोक विलक्षण एकाग्रतेने ऐकत होते. "समर्थ रामदास स्वामी रोज बाराशे सुर्यनमस्कार घालायचे. आपण बाराही घालत नाही! मग मनाचे श्लोक वाचून काय फायदा?"

"हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू म्हणजे श्री शंकराचार्य! यांच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे, त्या पदावर, त्या आसनावर माझी नितांत श्रद्धा आहे. मात्र शंकराचार्यांप्रती मला एक तक्रार आहे. ज्या वेळी शिवाजीमहाराजांना राज्याभिषेक होणार होता, तेव्हा तब्बल साडेतीनशे वर्षानंतर एक हिंदू राज्य जन्म घेतंय या नितांत आनंदाने दिपून जाऊन पाचही पिठाच्या शंकराचार्यांनी दोन्ही हात वर करून महाराजांना आशिर्वाद द्यायला हवे होते. मात्र एकाही शंकराचार्याने येऊ नये, ही केवढी अनास्था!" शिवाजी महाराजांबद्दल बोलतांना बाबासाहेबांमध्ये विलक्षण शौर्य संचारतं, शक्ती येते, याचा प्रत्यय आज आला. "राजा... राजा!! अरे शेकडो वर्षांच्या अंधारानंतर आशेचा पहिला किरण तुझ्या रूपाने उगवतोय, तुला आमचा आशिर्वाद असो!" असं एक पत्रही एकाही पिठाधीशाकडून येऊ नये, हे किती दुर्दैव?!" ते भारावून बोलत होते.

मला वैदिक काळातील ऋषिमुनिंची आठवण झाली. किती मोठा वचक, केवढी अधीसत्ता होती त्यांची भारतीय राजसत्तेवर! कोणीही मुनिवर, महर्षी कुठल्याही राजाच्या दरबाही कधीही येऊन धडकत असे. राजा महर्षींची पाद्यपुजा करी, आणि बसायला आपलं सिंहासनच त्यांना देई! ते मागतील ती गोष्ट राजा डोळे झाकून दान करत असे. मग विश्वामित्रांनी मागितलेलं प्रत्यक्ष जेष्ट पुत्राचं दानही दशरथासारखा चक्रवर्ती सम्राट नकारू शकत नव्हता, आणि स्वप्नात मागितलेल्या राजपाटाच्या दानाचाही विसर राजा हरिश्चंद्राला पडू शकत नव्हता. मात्र शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या वेळीपासूनच उदासिन होत चाललेली ही धर्मसत्ता आता तर पारच कमकूवत झालेली आहे. कांची-कामकोटीच्या शंकराचार्यांना अटक होउनही कुणालाच काही वाटत नाही, आणि ओरीसात स्वामी लक्ष्मणानंदांच्या हत्येनंतरही देशभर शांती राहते. मुळात याचं कारण म्हणजे 'अज्ञान!'

बाबासाहेब पुरंदरेंही याच विषयावर भरभरून बोलले. आपल्यापैकी अनेकांना अरूणाचल प्रदेशची राजधानी कुठली हे देखील माहिती नाही. आणि अरूणाचल प्रदेशवर चिन आपला हक्क सांगतोय, हे तर आपल्या गावीही नसतं. आपण भारत देशाचा विचार करतच नाही. आपल्या स्वतःचा, खुपच खुप आपल्या जातीचा, फारफार तर आपल्या राज्याचा विचार करतो. भारत या राष्ट्राचा विचार आपण का करत नाही? 'आपल्याला काय त्याचं!' हे परवलीचं वाक्यच आपल्याला घेऊन बुडणार की काय! वेळीच सावध व्हायला पाहिजे, बाबासाहेब सांगत होते...

मागे डॉक्टर राममनोहर लोहियांच 'सगुण और निर्गुण' हे पुस्तक वाचण्यात आलं. डॉ लोहीया उत्तरप्रदेशातल्या फैजाबादचे. आणि या माणसाने गोवा मुक्तीच्या आंदोलनाचं नेतृत्त्व केलं! कुठे उत्तरप्रदेश, कुठे गोवा! पण तो भारत या माझ्या देशाचा भाग आहे, तो भाग माझ्या देशात आला पाहिजे ही आस्था त्यांच्या ठायी होती. म्हणून देशभरातून सत्याग्रहिंच्या, आंदोलंकांच्या तुकड्या गोव्यात आल्या, आणि गोवा स्वतंत्र झाला. परमपुजनिय गोळवलकर गुरूजींचंही तसंच. ते देशभर असे फीरत जसे काही या भावाकडून त्या भावाच्या घरी पाहूणचाराला जातो आहोत. गांधीजीसुद्धा साबरमती वरून सेवाग्रामला आले. कुठून कुठे स्थायिक झाले. स्वामी विवेकानंद कलकत्त्यावरून कन्याकुमारीला गेले. या लोकांना सगळा भारत देशच आपला वाटायचा. म्हणून भारत देशासाठी या लोकांनी काहीतरी केलं. आपल्याला आपलं घर, आपला मोहोल्ल्या, आपली जात, आणि आपलं राज्य यांच्यातून वेळ मिळेल तर आपण संपुर्ण देशाचा विचार करू ना! धूर्त राजकारण्यांसाठी हे बरंच आहे. लोक जीतके कमी विचार करतील तीतकं त्यांना मेंढरासारखं हाकता येइल. माहितीच नसेल तर विचारच करणार नाहीत. म्हणून मग माहितीच देत नाहीत. अभ्यासक्रम ठरवतात, पण त्यातून चुकीचा ईतीहास शिकवतात. ईंग्रजांनी, मोगलांच्या बखरकारांनी -- म्हणजेच आपल्या शत्रुंनी लिहलेला ईतीहास आपण आज अभ्यासतो. आणि बाबासाहेब पुरंदरेंनी लिहलेला खरा ईतीहास आपल्यातलेच, शिवरायांचेच वंशज असलेले 'मराठा सेवा संघ' खोटा ठरवायला निघालेत.

ईतीहासाची कास धरून ठेवली तरच भविष्याचा वेध घेता येइल. आपण सगळ्यांनी खरा खरा ईतीहास अभ्यासायला पाहिजे. संपुर्ण भारत देशाचा ईतीहास. खर्र्याचा शोध घेऊन माहिती करून घेतली पाहिजे. मी तर प्रयत्न करणार आहे. विष्णू घनश्याम देशपांडे यांच्याप्रमाणे विचार आणि कर्तृत्त्वही करण्याचं सामर्थ्य अंगी यावं, यासाठी बळ देण्याची विनंती ईश्वराकडे करणार्र्या बाबासाहेब पुरंदरेंच्या पायावरती डोकं ठेवून त्यांच्या प्रार्थनेला बळ यावं अशी करूणा मी भाकणार आहे.

31.12.10

संकल्प!

आजपासून रोज लिहणार आहे.

म्हणजे तसा संकल्पच केलेला आहे. थोडं ना थोडं तरी लिहायचं. आपल्याला वेळ काढता येत नाही, हे काही कारण नाही.

डिसेंबर महिन्यात अमिताभ बच्चन पेंच व्र्याघ्र्यप्रकल्पाच्या दौर्र्यावर आला होता. अमीताभ संध्याकाळी पाच वाजता नागपूर विमानतळावर उतरला, आणि विमानतळाच्या समोर उभ्या असलेल्या हजारो चाहत्यांना चुकवून मागच्या बाजूच्या रस्त्याने सोनेगावमार्गे पेंचकडे कुच केलं. मात्र सोनेगाव रस्त्यावरही काही उत्साही चाहते आणि पत्रकारांनी त्याला गाठलंच. तीथे काही मिनिटांसाठी थांबून अमिताभने चाहत्यांना सह्या दिल्या, पत्रकारांशी हितगुज केलं, आणि जास्त गर्दी व्ह्यायच्या आत तीथून पेंचकडे प्रयाण केलं.

अमिताभ सात-साडेसात पर्यंत पेंच ला पोचला असावा. आम्ही सर्व न्युजरूम मध्ये अमिताभची बातमी कशी घ्यायची यावर चर्चा करत होतो. फोटोग्राफरने फोटो आणले होते. कुणीतरी बातमी आणली होती. अमिताभच्या बिग-अड्डावरच्या ब्लॉगवरतीसुद्धा सहज म्हणून भेट दिली. नागपूरकडे निघण्याच्या आदल्या दिवशी त्याने ब्लॉगवरती पेंचबद्दल लिहलं होतं. "पेंचला जाऊन वाघ पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. या डौलदार जनावराचं संरक्षण व्हायला हवं" या आशयाचा तो लेख होता. त्यातली काही वाक्यं आम्ही बातमीमध्ये वापरली. एक ठीकठाक बातमी तयार झाली.

दहाएक वाजताचा सुमार. पानं बांधून पाठवण्या आधी सहज म्हणून पुन्हा अमिताभच्या ब्लॉगला भेट दिली. आणि काय आश्चर्य! अमिताभने आजचा नवाकोरा ब्लॉगही लिहला होता. नागपूर ते पेंच या प्रवासादरम्यान त्याला दिसलेलं नागपूर शहर, जंगलात जातांना वाटलेली उत्सुकता, आणि पेंचच्या रिसॉर्टमधली हिवाळी रात्र या सगळ्याबद्दल अमिताभने आपल्या ओघवत्या ईंग्रजीत खुप छान लिहलं होतं. वेळेवर बातम्या हलवल्या, आणि अख्खाच्या अख्खा ब्लॉगच अमिताभच्या बातमिबरोबर लावायचं ठरवलं. तेव्हा जाणवलं. बिझी बिझी म्हटलं, तरीही आपण काही अमिताभपेक्षा जास्त बिझी नाही. जर बिग बी वेळ काढू शकतो, तर आपण नक्कीच काढू शकतो. मग ठरवलं. ब्लॉग रोज लिहायचा. नव्या वर्षाचा संकल्पच हा!

नव्या वर्षाचे संकल्प सहसा विसरून जाण्यासाठी असतात, असं म्हणतात. पण हा संकल्प मात्र विसरता येणार नाही. कारण हा संकल्प आजचा नाही. साडेतीन वर्ष झाली गाव सोडून. ब्लॉग बनवून ठेवले आहेत अगदी तेव्हापासूनच. या साडेतीन वर्षात निदान साडेतीनशेवेळा तरी ठरवलं असेल की लिहायचं.. लिहायचं! पण नाहीच जमलं. अमिताभने मात्र प्रेरणा दिली आहे. आता लिहणार.

आज नव्या वर्षाचा पहिला दिवस. सगळं छान छान झालं पाहिजे. म्हणजे वर्ष छान जाईल. आजचा दिवस असाच एका नवेपणाच्या जाणिवेसह जाईल. तसाच एकतीस डिसेंबरचा दिवसही! कितीही नाही म्हटलं तरी थर्टीफर्स्टची एक उत्सुकता राहतेच. आपल्याला माहिती असतं, की रोजच्यासारखाच आजचाही दिवस निघणार आहे. रोजच्यासारखंच आजही कुठेतरी रिपोर्टींगला जायचं आहे. रोजच्यासारखंच आजही पान बांधायचं आहे. आणि रोजच्यासारखंच आजही 'बारा वाजता संपवतो' असं म्हणता म्हणता दिड वाजेपर्यंत शेवटचं पान सोडायचं आहे! तरीही एक उत्सुकता असते. आज वर्षाचा शेवटचा दिवस! काहीतरी सेलिब्रेट केलं पाहिजे. कुठेतरी गेलं पाहिजे. काहीतरी पार्टीशार्टी! पण या वर्षी थर्टीफर्स्ट खुपच थंडा निघाला. अक्षरश: ब्रेड बटर आणि कटलेटवर थर्टीफर्स्टची पार्टी! विश्वास बसत नाही!

पाचेक वाजताच्या सुमारास अनुभव डबीर घरी आला. "चल हिंडून येऊ! शहरातला माहोल पाहू!" नेहमीचंच! निघालो. तेही नेहमीच्याच रस्त्याने. फिरत फिरत सदरमध्ये आलो. मग कॉफी हाऊस! आणि कॉफी हाऊसमध्ये गेलं की ब्रेडबटर आणि साधा दोसा! ऑर्डर्स दिल्या. "आज कटलेट मंगवाते है" -- चालेल! व्हेज कटलेटही मागवलं. तोच ऑफीसमधून फोन आला. डेस्कहेडचा. "जल्दी आ जाओ, आज जल्दी खत्म करके घर चले जाएंगे!" -- सदरमधून घरी जाणं आणि घरून परत ऑफीसला धंतोलीला येणं म्हणजे सहाच्या आत पोचणं अशक्यच होतं. अनुभवला म्हटलं, की मला ऑफीसमध्येच सोडून दे. बर्र्याच दिवसांनी गाडी न घेता ऑफिसला गेलो. पण घरी जायचे वांदे होणार! कुणालातरी सोडून मागावे लागणार!-- असो. थर्टीफर्स्ट आहे. कुणीही सोडून देइल! ऑफीसला गेलो. गेल्यावर असा काही अडकलो, की बाहेर जाण्याचं कामच नाही. मला बोलावून डेस्कहेड घरी गेला - 'मेहमान' आले होते ना! काम सुरू झालं. हा आला, की आपण बाहेर जाऊ जेवायला असा विचार करून त्याची येण्याची वाट बघत राहिलो. महाशय अकरा वाजता आले! म्हणजे माझं बाहेर जाणं राहिलंच! अच्छा ऑफीस झाल्यावर बाहेर जावं, तर जवळ गाडी नाही! शेवटी त्यालाच घरी पोचवून मागीतलं आणि सरळ घरी आलो.

आता भूक लागली आहे. पण तरीही आज आपल्या संकल्पाचा पहिला दिवस, म्हणून लिहलं.
आजचा हा भुकेल्यापोटी लिहलेला ब्लॉग काहीतरीच अजाग़ळ वाटू शकतो, पण संकल्प म्हणजे संकल्प! पहिल्याच दिवशी परिक्षा पाहिली वाटतं देवा! ठीक आहे! पर हम भी कुछ कम नही! आजपासून लिहणारच!

जीव जाओ का जलेबी खाओ!

30.8.10

पावसानं ईचीन...

या वर्षी पावसाला काय झालं आहे कळत नाही. तुफान बरसतो आहे. या पावसाला कुणाची नजर लागायला नको. सहज म्हणून पाऊस पहायला निघालो होतो, तेव्हा रिपरिप सुरू होती. पण आपल्याला पहायला क़ुणीतरी आलंय या आनंदानं जणू काही पावसाला भरतंच आलं आज. दे धमाल बरसला पाऊस. जवळपास तासभर. लोकांना गरमी होतेय म्हणून एखादी सर बरसवणारा आणि निघून जाणारा हा उसन्या अवसानाचा पाऊस नव्हता. एखाद्या नृत्यांनगनेची नृत्य करता करता समाधी लागावी, आणि स्वतःच्या समाधानासाठी तीच्या पावलांनी थीरकण्याचं थांबूच नये.. असा आज पाऊस बरसतच राहिला. रस्ते तुडुंभ भरले, वाहनं थांबुन गेली, पायी चालणार्र्यांनी तर सपशेल शरणागती पत्करली पावसापुढे. आडोसा घेऊन उभे असलेल्यांची आज पावसाने कदर केली नाही. छत्री- रेनकोट घालून पावसाला टाळू पहाणार्र्यांची त्याने तमाच बाळगली नाही. रेनकोट छत्री, आणि कपडे, सगळी आवरणं भेदत पाऊस थेट हृदयाला जाऊन भिडला.

पाउस हृदयाला भिडला. आणि आज जवळपास चार पाच वर्षांनी "पावसानं ईचीन कहरच केला.. अन लोक म्हने नागोबुढा वाहूनच गेला.." या ओळी आपोआपच आठवल्या. व्हराडी कवीतांचा 'राजा माणूस' शंकर बढेंची ही कवीता. या कवीतेने बाबा बढेंना व्हराडी कवीतेच्या क्षेत्रात नाव मिळवून दिलं. मी चार वर्षांचा असेल तेव्हा. असेच पावसाळ्याचे दिवस होते आणि कसलातरी सांस्कृतीक कार्यक्रम होता. सकाळपासून मामा लोकांनी माझ्याकडून 'पावसानं ईचीन कहरच केला' ही कवीता म्हणवून घ्यायचा चंगच बांधला होता बहुतेक. नवंनवंच वाचायला शिकलो होतो. समोर शंकर बडेंचा कवीता संग्रह होता. संग्रह कसला! अगदीच साधारणश्या पुस्तीकेसारखा दिसणारा काही कागदांचा सेट. हल्लीच्या हार्डबाऊंड-ग्लॉसी कव्हरपेज-आकर्षक फॉन्ट-आणि ईल्युस्ट्रेशन्स वगैरे असणार्र्या कवीतासंग्रहांसारखा तो मुळीच नव्हता. खिळे लावून बनवलेल्या प्रिंटींग मशिनवरच्या एकाच फॉण्टने सुटसुटीत लिहलेल्या अक्षरांचा संच. 'पावसानं ईचीन..' ही कवीता मी सकाळपासूनच वाचत होतो. 'बुढीसंग त्याचं भांडन झालं ज्यमुन, न रागंरागं पोरीकडं गेला तो निंगुन' या ओळी असो, किंवा नागोबुढा खरंच वाहून गेला, असं म्हटल्यावर 'बुढी त बापा, गया काढुन लडे, न दाट्ट्यात ईचीबहीन उठुउठु पडे' ही ओळ असो, श्याम मामाने अगदी व्हराडी लेहज्यात माझ्याकडून ती म्हणवून घेतली होती. मध्येच आई, अतुल मामा, आणि बाबाही 'दुरूनच दिशे त्याचा रंगीत शेला..' या ओळीतला ला... कसा वाढवायचा, याचं ट्रेनिंग देत होते. संध्याकाळी समजलं, की वर्र्हाडी कवी संमेलनात शंकर बडेंच्या उपस्थीतीतच मला ही कवीता म्हणायची आहे. जवळपास सगळी कवीता पाठ झाली होती. फक्त प्रत्येक कडव्याच्या सुरवातीला एक स्टार्ट लागत होता. त्यासाठी मग मी पुस्तक सोबत ठेवायचं ठरवलं. तश्या पद्धतीने दोन चार वेळला रंगीत तालीमही केली. आणि "तो पोरीच्या गावाले जाऊन बी आला न तुपासंग पोळी खाऊन बी आला, न तरी म्हने एक रस राहूनच गेला... न लोक म्हने नागबुढा वाहूनच गेला.." या ओळीसह सगळी कवीता जमायला लागली. वेळेवर झालं मात्र भलतंच.

कवी संमेलनाला वेळेवर पोचलो, आणि नेमकं सगळेच जण पुस्तक बरोबर घ्यायचं विसरले. सवय पुस्तकातून पहिली ओळ पाहून म्हणण्याची झाली होती. म्हणजे आता जमण्यासारखं काही नव्हतं. दुसरं पुस्तकही तीथे नव्हतं. स्वतः शंकर बडे कवीतांचं पुस्तक बरोबर घेऊन कवीसंमेलनाला येत नाहीत. आपल्या कवीता त्यांना पाठ असतात. त्यामुळे आता माझं कवीता वाचन रद्द होते की काय असं वाटायला लागलं. आईने मला धोतर, टोपी, जॅकॅट वगैरे टीपिकल व्हराडी पोषाख करवून आणलं होतं. वेळेवर पचका होतोय हे पाहून मला थोडं विचित्र वाटत होतं, पण नक्की काय वाटत होतं ते मात्र आठवत नाही. मग अचानक शाम मामा आला. म्हणाला "लाल्या स्टेजवर जा अन माईकपुढे बस." म्हटलं जेवढं येइल तेवढं म्हणू. जाऊन बसलो. सुरवात केली ... 'पावसानं ईचीन कहरच केला, न लोक म्हने नागोबुढा वाहूनच गेला...' टाळ्या वाजल्या. पुढे काय? क्षणार्धात कानात एक हळूवार आवाज आला. "बुढीसंग त्याचं.." मला हा स्टार्टच हवा होता. सुरू झालो. मग प्रत्येक कडव्याला सुरवातीला मला असा स्टार्ट मिळत गेला, आणि कवीता झक्कास झाली. त्यानंतर कौतुकाने मला स्टेजवरून आपल्या खांद्यावर उचलून आणणारा, आणि कवीते दरम्यान मला स्टार्ट देणारा, माझ्या बाजूला बसलेला व्यक्ती म्हणजे स्वतः शंकर बडे च आहे, हे माझ्या नंतर लक्षात आलं.

बाबा बढेंची 'पावसानं ईचीन कहरच केला' ही कवीता मग प्रत्येक पावसाळ्यात माझा सुपरहिट आयटम ठरू लागली. तेव्हा पाऊस खरोखरच कहर करत असे. गेल्या तीन चार वर्षात मात्र ही कवीता आपोआप स्फुरलीच नाही कधी. पाउस तसा कहर करतच नव्हता, असं नाही. बरेचदा करायचाही. पण जेव्हा नको असेल, तेव्हा. नेमकी पेरणी झाली की पाऊस कहर करायचा आणि छोटीचोटी रोपं मरून जायची. दुसर्र्या पेरणीचं पीक कापणीवर आलं की मग पाऊस कहर करायचा, आणि मग कास्तकारांची पुरती वाट लागायची. हे सत्र गेल्या पाच सहा वर्षापासून सुरू होतं. पाऊस बरसतच नसे. आणि बरसलाच तर अवेळी. त्यामुळे फक्त पावसावर पोट असलेले कास्तकार हतबल झाले. हजारोंनी आत्महत्या केल्या. 'पावसानं ईचीन..' हे शब्द या कोरड्या वादळात कुठेतरी गडप झाले होते. पण आज ते आठवले. पावसाचा या बेभान नृत्याविष्कारानंतर "पाह्यटीस बुढा गावातच दिशे, न लोकायकडं पाहून खुदुखुदु हशे" या ओळीप्रमाणे यंदातरी कास्तकारानं खुदुखुदु हासावं असं वाटून गेलं.

बाकी वरच्यावर डिपेंड हाय!

9.9.09

मोबाईल

अचानक मोबाईल खराब झाला. काही बटणं पुरती कामातूनच गेली. एसएमएस पण टाईप करता येइनासा झालाय आणि कुणाला फोन लावावा म्हटलं, तर तेही मोठं कठीण होउन बसलंय. कुणाचा फोन आला, तर तो उचलायचा की नाही, हे ही आता मोबाईलच ठरवतोय. कारण रिसिव्ह चं बटण कधी काम करेल, आणि कधी नाही, हे त्याचं त्यालाच ठाऊक आहे. गैरसोय होत आहे. पण हा देखील एक नवा अनुभव. वस्तू आहे. कधी ना कधी खराब व्हायचीच. दूसरीही येइल. पण या मोबाईलच्या खराब होण्याच्या निमित्ताने आठवणींच्या एसएमएस नी मनाचा ईनबॉक्स फूल करून टाकला, त्याचं काय?
मिळाला तेव्हा खूप क्रेझ होती मोबाईलची. जेव्हा भाउबिजेला अनिल मामाने आईला ओवाळणीत मोबाईल दिला, तेव्हा मलाच धन्य झाल्यागत वाटलं होतं. तासनतास 'स्नेक' खेळत बसायचो, या गोष्टीचं आज आश्चर्य वाटतं, पण हाईयस्ट स्कोरमध्ये साडेचारहजाराचा आकडा पाहिला, की परत विश्वास बसतो. वेड होतं. आपण वेडे होतो का तेव्हा?! नाही. पण ते दिवसच बेटे तसे होते. कुणाचा तरी फोन यावा आणि मोबाईलची रिंगटोन वाजावी म्हणून कान टवकारूनच बसलेलो असायचो. फोन यायचाच नाही सहसा. आला तर एखादा, तोही मोबाईल कंपनीवाल्यांचा फोन. त्याचंच भारी अप्रूप होतं. कुण्या नातेवाईकाचा फोन एखाद्यावेळी आलाच, तर खूप नवल वाटायचं. मित्र तर फोन करतच नव्हते. मिसकॉलचीच भाषा प्रचलीत होती. कारण पैसेच नसायचे तीतके खीशात.
पैसे नाहीत म्हटल्यावर मैत्रीणी कश्या असणार? मग त्यांचेही एसएमएस किंवा कॉल्सही नव्हते. मोबाईल मुकाच पडलेला असायचा. अरेच्या, चुकलो. मोबाईल मुका असायचा,पण पडलेला नसायचा. जवळच असायचा नेहमी. वाटायचं की कुणाचातरी फोन येइल. कधीकधीच ही ईच्छा पुर्ण व्हायची. त्यातही कधी एखाद्या अनोळखी नंबरवरून कॉल आला, तर खूपच अप्रुप! सलग दोनचारवेळा त्याच नंबरवरून मिसकॉल आला, तरी एक कहाणी बनायला पुरेसं होतं. रॉंग नंबर आलाच कधीमधी, आणि समोर मुलीचा आवाज असला, तर ही गोष्ट कॅन्टीनमध्ये एक-एक चहा आणि ब्रेडपकोडा खीलवण्यासाठी पुरेशी असायची.

ऐनवेळेवर नाटकाच्या प्रॅक्टीसची बदलेलेली वेळ सगळ्यांना मी याच मोबाईलवरूनच कळवायचो. राज्यनाट्यस्पर्धेत प्रशस्तीपत्र मिळाल्याबद्दल अभिनंदनाचे फोनही यानेच रिसिव्ह केलेत. सकाळच्या एकांकीका स्पर्धेत मी बसवलेलं नाटक अव्वल आल्याचा फोनही वैभव टप्पेने याच मोबाईलवर केलेला होता. याच मोबाईलवर फायनल ईयरचा निकाल नेटवर आल्याची खबर मी सगळ्या मित्रांना दिली. याच मोबाईलवर 'ईस धीस चैतन्य? आय ऍम आलोक तीवारी फ्रॉम हितवाद. यू आर सिलेक्टेड फॉर द जॉब." म्हणून फोनही मी रिसीव्ह केला. गाव सोडून जातांना "मोबाईलमध्ये पैसे आहे नं रे? बोलावसं वाटलं तर फोन करशील," असं म्हणून आपल्या डोळ्यातलं पाणी लपवणारी आई -- "आता मोबाईल आहे नं त्याच्याजवळ, कधीही वाटलं, तर लावायचा फोन!" असं म्हणणारे बाबा -- आणि "दादाचा मोबाईल नंबर - ९९२२३२९९७६" असं आपल्या गोलगोल अक्षरात फोनजवळच्या भिंतीवर लिहून ठेवणारी लहान बहीण. या मोबाईलचीच देण नव्हती का?
ज्याच्यामुळे हा मोबाईल मिळाला, तो अनिलमामा खूप सिरिअस असल्याची बातमीही याच फोनवरती ऐकली. अनिलमामा अवेळी निघुन गेल्याची बोहारी बातमीही याच फोनने दिली. त्याची आठवण म्हणून हा फोन खूप दिवस वापरायचा, कधीच नाही सोडायचा, हे तेव्हा ठरवलं होतं. कदाचीत खूप दिवस झालेत आता. खूप दिवस.

27.5.09

पाऊस

हल्ली संध्याकाळी आभाळ भरून येतं. पण पाऊस येत नाही. दूपारच्या तळपत्या उन्हानंतर संध्याकाळी जरावेळ थंड वारंही वाहतं. पण पाऊस मात्र येत नाही. अगदीच नाही असंही नाही, पण आला तरी दोन चार थेंब. त्यानंतर नाही. वारा ढगांना घेऊन जातो असं म्हणतात ना, तसे "बरसतो बरसतो..." असं म्हणत ढगांची स्वारी अलगद गडप होते. या शहराची म्हणे ही रीतच आहे.
गावात मात्र पाऊस असा यायचा नाही. उन्हाळ्याच्या शेवटी शेवटी एखाद्या संध्याकाळी ढगांची दाटी व्हायची आणि अवघ्या काही क्षणांत जणू आभाळ फाटल्यासारखा मुसळधार बरसायला लागायचा पाऊस. बाहेर वाळत टाकलेले कपडे दोरीवरून काढून आणायला गेलेली आई तेवढ्या वेळातच ओलीचींब होउन जायची, ईतका पावसाचा जोर असायचा. मग विजाही चमकायच्या आणि वादळही! कितीही खीडक्यांची तावदानं लावा, की दरवाजे बंद करा, पाऊस घरात यायचाच. चारही दिशांनी झोडपून काढायचा.
विजा कडाडत असतांना बाहेर जायला मिळायचं नाही, तेव्हा घरातनंच पाऊस पहायला लागायचा. मग एखाद्यावेळी मोठा प्रकाश बाहेर दिसला, की थोड्यावेळाने मोठी विज कडाडण्याचा आवाज येणार, त्याची वाट पहात बसायचं. प्रकाशाचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त आहे, म्हणून विज चमकलेली आधी दिसते. मग तीचा कडकडाट ऐकू येतो. हे खूप नंतर माहिती झालं, पण त्याआधी जास्त चमकणार्र्या विजेवरून येणारा आवाज किती मोठा असेल याची कल्पना करण्यातच मजा यायची.
पाऊस आमच्या पुर्वमुखी घराच्या मोठ्या दरवाज्यातूनच घरात दाखल व्हायचा. बैठकीच्या खोलीतल्या खीडकीमधून आत येऊन तो स्टुलवर ठेवलेला आजचा पेपर ओला करायचा. आजीच्या खोलीच्या मोठ्या खीडकीतून येणारा पाऊस हमखास तीची अवघी खोलीच भिजवून टाकायचा. आजी मात्र ज्या खोलीत गहू आणि तांदळाच्या कोठ्या होत्या, तीकडे जाऊन उभी असलेली असायची. धान्य भिजलं, तर ते खराब होईल, म्हणून खीडकीच्या फुटक्या तावदानाला ती पेपरच्या गट्ठ्याने झाकत असायची.
पण शहर मुळातच ऋतूवेगळं आहे. ईथे पाऊस आला तरी तो ऑफीसमध्ये जायच्या-यायच्या वेळेपर्यंत दहा-पंधरा मिनिटांची सुट देतो. क़ुणालाच तो जबरदस्ती भिजवत नाही. आडोसेही लवकर मिळतात. आणि शिस्तीत पडणारा पाऊस आडोशाला उभ्या असलेल्या एक्झीकेटीव्जना भिजवतही नाही.
पहिला पाऊस अचानक येत नाही. वेल ईन ऍडव्हान्स नोटीस देऊन येतो. दोन तीन वेळा ढग़ दाटून येतात. पाऊस येत नाही. ही नोटीस समजून लोक गाडीच्या डिक्कीत रेनकोट ठेवणं सुरू करतात. पहिल्याच पावसात रेनकोट निघालेले पाहिले, की आश्चर्यही वाटतं, आणि कामाच्या व्यापात निसर्गाचा आनंद गमावलेल्या लोकांची किवही येते. पण मीही आता याच गर्दीचा भाग आहे.
त्या दिवशी असेच ढग दाटून आले. खूप पाऊस येणार असं वाटलं. म्हटलं भिजायचंच! आणि मुद्दाम निघालो. वारा-वावटळ खूप आली. पण पाऊस आलाच नाही. हिल-टॉप, सिव्हील लाईन्स या तूलनेने हिरव्या भागातही गेलो. पाऊस आला नाही. फुटाळा तलावाच्या काठावर जाऊन उभा राहिलो. पाऊस आलाच नाही. निराश झालो. घरी आलो. आणि शिस्तबद्ध पावसाने बरसायला सुरूवात केली. शहरातला पाऊसच भिजवायला तयार नसतो. मग लोक कोरडेच राहीले, त्यात काय नवल?
तू देखील शहरात राहून कोरडीच राहीलेलीस. मी जे बोललो, त्यातला ओलावा तूला कळलाच नाही. नाही तर नाही. यात तूझा दोष नाही. शहराचाही नाही. हल्ली गावामध्ये राहाणार्र्यांच्या मनातही शहरच वसलेलं असतं. तीथे शहरातच राहिलेल्यांची काय कथा? असो. पावसात भिजायची ईच्छाच झाली नाही, तर न भिजल्याचं दुःख होत नाही. पण भिजायचं असूनही रेनकोट चढवणं म्हणजे मन् मारणं नाही का? तू मन मारतेयस्. भिजत नाहीयेस. आडोशालाच उभी आहेस. आता मी शहराचाच भाग झालोय. म्हणून पाऊसही शहरी आहे. तो तूला जबरदस्तीने भिजवणार नाही. कितीही ईच्छा असली, तरीही.

26.12.08

संध्याकाळ अन आठवण

.. .. .. ...
हल्ली संध्याकाळ अनुभवायलाच मिळेनाशी झालेली आहे. तशीही वृत्तपत्रविश्वात काम करणार्र्यांना संध्याकाळ कमीच अनुभवायला मिळते. आमचं तर कामच नेमकं संध्याकाळी सुरू होतं, आणि रात्री उशीरापर्यंत चालतं. त्यामुळे संध्याकाळचे असंख्य रंग डोळ्यांऐवजी मनातच आपली उधळण करत असतात. आजवर अनुभवलेल्या संध्याकाळची आठवण मग आजच्या संध्याकाळीचं चीत्र मनात गुंफायला लागते. हल्ली या आठवणींच्या भरवश्यावर कामाचं त्राण मिळवता येऊ लागलं आहे. मात्र पुर्वी खूप विचीत्र वाटायचं हे. संध्याकाळच्या, तीन्हीसांजेच्या, दिवेलागणीच्या, सांजवातीच्या वेळी, घरी परत यायच्या वेळी, आपलं घरातून बाहेर पडणं. पण आठवणींच्या बळावर निभावून नेणं जमायला लागल्यापासून बरंच बरं आहे. तसंही आठवणींच्या भरवश्यावर आता बरंच काही जमवावं लागतय, आणि जमवावं लागणार आहे.
ही तूमचीच कृपा. काही दिवसांचीच आपली सोबत. पण ती नेहमीकरताच असावी असं वाटण्याईतकी सुंदर तूच बनवलीस. मला तर वाटलं होतं, की ही सोनेरी सोबत कायम रहाणार नेहमीसाठी. म्हणूनच तूला न वीचारता तशी स्वप्नही पहायला लागलो. पण तूला जणू माहितीच होतं, की आपली सोबत जास्त दिवसांची नाही. म्हणूनच मिळाले तीतक्या क्षणांचा तू ‘मोगरा’ केलास. आज हातून सुटला, तरी सुगंध कायम राहिल त्यांचा दिगंतापर्यंत.
आता त्या सोनेरी क्षणांच्या आठवणींच्या हिंदोळ्यावर मला एकट्यालाच झुलायचं आहे. संध्याकाळची सवय व्हायला वेळ लागला होता. तसाच तूझ्या नसण्याचीही सवय व्हायला लागेल.

पण होईल सवय. करावीच लागेल.

पण तू परतच का येत नाहीस? नेहमीसाठी?

खरं सांगू... आयुष्य़ात पहिल्यांदा प्रेम केलं. हो म्हणाली असतीस, तर जीवापाड जपलं असतं हे पहिलं प्रेम. पण नाही म्हणालीस, हे ही ठीक आहे. कारण जी गोष्ट पुर्ण होते, ती संपते. माझं पहिलं प्रेम अपुर्ण आहे. म्हणजे ते संपलेलं नाही. संपणारही नाही. सतत, आयुष्य़भर माझ्या बरोबर राहील. तू मोगरा केलेल्या क्षणांच्या दरवळाच्या रूपाने. तूझ्या सोनेरी सोबतीच्या आठवणींच्या रूपाने.