8.12.11

असेन मी... नसेन मी!


काय झालंय कळत नाही! असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे! आज अचानक आठवल्या या ओळी. याआधी कितीतरी वेळा ऐकलेलं गाणं! पण आज अचानक आठवलं परत! आज परत ऐकलं ते गाणं! डोळ्यातून पाणी येत नाहीय; पण असं वाटतंय की खुप रडत आहे मी!

अरूण दातेंच्या आवाजात हे गाणं काही दिवसांपुर्वी लाईव्ह ऐकायला मिळालं होतं. नागपूरच्या एका कार्यक्रमात ते मुलाबरोबर आलेले होते. दाते साहेब आता पंचाहात्तरी पार आहेत. अजुनही लाईव्ह शो मध्ये ते गातात आणि आजही आवाजात तोच रेशमी स्पर्ष आहे. हे एक आश्चर्यच नाही का! गाता गाता जावे आणि जाता जाता गावे - अशीच ईच्छा असल्याचं ते म्हणाले. मी विचारलं होतं त्यांना, की काहीतरी राहून गेल्याची खंत आहे का मनात? प्रश्न अनपेक्षीत असावा त्यांना! बराच विचार केला त्यांनी आणि मग एकदम स्पष्टपणे सांगीतलं - 'नाही! काहीच खंत नाही!' खुप छान वाटलं ते ऐकुन. त्यानंतर त्यांचं गाणं ऐकतांनाही 'असेन मी नसेन मी' च्या वेळी काहीतरी वाटलं होतं. मात्र आजच्याईतकं नाही!

अरूण दातेंची गाणी मी किती पाठ केली होती लहानपणी! या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे! आईचे एक मामा होते - बाबा मामा! ते अरूण दातेंसारखेच दिसायचे. म्हणुन मी अरूण दातेंना बाबा आजोबा म्हणायचो तेव्हा. त्यांची गाणी म्हणुन दाखवून मी कितीतरी वेळा भाव खाल्ला आहे. तेव्हा गाणं म्हणता यायचं, त्यातला अर्थ किंवा भावार्थ कळायचा नाही. तो कळायला लागला, आणि समजलं की आपण कितीही काही केलं तरी फक्त गाणं म्हणु शकतो; गाणं गाऊ शकत नाही! पण म्हणुन काय झालं? गाणं ऐकू तर शकतोच ना! मग ऐकायला लागलो खुप मन लावून! आणि मग समजलं, की ऐकण्यात तर गाण्याहून जास्त थ्रील आहे. हे थ्रील नेहमीच वाटत आलेलं. मात्र आजच्याईतकं नाही!

शांता शेळकेंचे हे शब्द. त्यांचं याच नावाचं आत्मचरित्रही आहे. डोक्यावरून पदर घेतलेला त्यांचा हसरा फोटो त्यावर आहे. असे शब्द लिहणारे लोकही खुप अलौकीक असतात. किती सहज किती मोठी गोष्ट भरकन लिहली जाते त्यांच्याकडून. शांन्ता शेळकेंची पैठणी नावाची कवीता मला आठवली. आठवीत की नववीत असतांना मला होती ही कवीता. वाचल्यानंतर तेव्हा काहीतरी वाटलं होतं. असंच काहीसं! रडू आल्यासारखं. आजही "कधीतरी ही पैठणी, मी धरते ऊरी कवळुन! मऊ रेशमी स्पर्शामध्ये, आजी भेटते मला जवळुन" सारखी ओळ आठवली की तसंच काहीसं वाटतं. थेट रडू आणण्याईतक्या ताकदिचे शब्द कसे सुचत असतील या लोकांना! 'असेन मी नसेन मी' हे गाणंही मुळात अश्याच ताकदिने भरलेलं आहे.

त्यातल्या त्यात ही भैरवी आहे. भैरवी मुळातच तर मनाला भीडणारा सुर! त्यात हे शब्द आणि दाते साहेबांचा अढळ स्वर! हे निर्वाणीचं गाणं आहे. भैरवीचे सुर आहेत. गाण्याच्या अंत-यात खुप जास्त वेदना आहेत, निरोप घेतानाच्या! पण 'असेन मी नसेन मी' या मुखड्यावर गाणं परत हसरं होतं. जणु काही काठोकाठ पाण्यांनी भरलेल्या डोळ्यानी आपल्याकडे पहात, आणि त्याच वेळी ओठावर हसु आणत आपलं कुणीतरी जवळचं माणुस आपला निरोप घेतंय! मात्र हे हसू जबरीने आणलेलं किंवा आपल्याला बरं वाटावं म्हणुन मुद्दाम आणलेलं नाही. ते मनापासून आलेलं हसू आहे. आणि डोळ्यातले आसुही मनापासून आलेले आहेत. ईतकं सगळं एकाच वेळी वाटतं की ते शब्दात मांडता येत नाही. मग रडू येतं.

पण माहिती नाही, आज डोळ्यातून पाणी आलं नाही! असं वाटत राहिलं की खुप रडू येइल! डोकं जड झालं. बोटं आपोआप किबोर्डवर चालायला लागली. हे सगळं धडाधड टाईप झालं.

रडू आल्यावर डोळ्यातून पाणीच आलं पाहिजे असं काही नाही. कधीकधी मनातून शब्दही येतात.

4.4.11

ती नक्की कोण?

भारताने वर्ल्डकप जिंकला होता आणि नागपूर नगरीमध्ये 'न भुतो न भविष्यती' अशी धम्माल सुरू होती. लक्ष्मीनगर चौकापासून ते लॉ कॉलेज चौकापर्यंत जवळजवळ सात आठ किलोमिटरचा रस्ता लोकांच्या गर्दिनी फुलून गेला होता. पाय ठेवायलाही जागा नव्हती. कशीबशी एक चक्कर आजुबाजुच्या गल्लीबोळातून मार्ग काढत मारून आलो. सोबत फोटोग्राफर होता. तो त्याच्या कामात मग्न होता. एकामागोमाग एक फोटो घेत होता. लोक, मुख्यत्त्वे करून तरूणाई बेभान! निमित्तही तेवढंच भारी होतं. पोलीस रस्त्यावर उभे होते. ते सुद्धा आनंद बघत होते. काही ईलाज नव्हता. कुणाकुणाला थांबवणार? नव्वद टक्केच्या वर लोक 'प्यायलेले' होते.

निमित्त विश्वचषकाचं होतं. आनंदाचा क्षण होता. तो सगळ्यांनाच साजरा करायचा होता. विनाकारण लोकांना पकडून रंगाचा बेरंग कशाला करा? या विचाराने पोलीस आपले शांत उभे होते. ऑफीसमध्ये परत आल्यावर आपल्यालाही केवळ जल्लोषाचंच चित्रण करायचंय, असं सांगण्यात आलं. म्हटलं ठीक आहे! आनंद तर होताच! काही लोक प्यायलेले असले म्हणून काय झालं? काही राडा तर कुणीच केला नाही ना? मग झालं तर! आज अट्ठाविस वर्षानंतर आलेला हा क्षण साजरा करतांना थोडी बेपर्वाई होणारच, असा विचार केला, आणि भरपूर गर्दी असलेले फोटोस निवडून 'हिप हिप हुर्रे!' असा एक रिपोर्ट लिहून टाकला. काम रोजच्यापेक्षा लवकरच संपलं. लवकर म्हणजे रात्री दिड वाजता.

आनंदातच घरी परतलो. म्हटलं टिव्ही लावावा, आणि माहोल पहावा! जवळपास दोन अडिच चा सुमार असावा. रूमच्या खिडकीतून समोर दिसणार्र्या फाटकावर कुणीतरी गाडि ठोकल्याचा आवाज आला. खिडकी उघडून पाहिलं. समोरच्या घरात राहणारी मुलगी होती. कदाचित वर्ल्डकप चं सेलिब्रेशन मित्र-मैत्रीणींबरोबर करण्यात तीला वेळेचं भान राहिलं नसावं. घरातले लाईटस वगैरे लागलेले होते. अगदी भाडेकरूंच्या घरातले देखील. यावरून बर्र्याच वेळपासून तीच्या घरचे लोक तिची वाट पहात असतील, किंवा शोधाशोध सुरू असेल, असा अंदाज आला. तीने फाटकावर गाडी ठोकलेली पाहून सगळे चक्रावलेच! तीची आई भरकन फाटकापर्यंत धावत गेली.

"काय झालं गं!?" ती अशी अचानक पडलेली पाहून तीच्या आईने किंकाळीच फोडली. "ईंडिया ईंडिया!!!!" ती चाचपडत उठून बसत बोलली. एव्हाना त्यांच्या भाडेकरूच्या घरातून लोक फाटकाजवळ आले. गाडी उचलून घरात नेली. भाडेकरूच्या घरातील बाईला लक्षात आलं की मुलीने खूपच दारू प्यायलेली आहे. उगाच फाटकाजवळ तमाशा नको, असा विचार करून तीने माय लेकींना घरात नेण्याचा प्रयत्न सुरू केला. "चला काकू आत जाऊन बोलू. दोन वाजून गेले!" असं काहीसं बोलत ती दोघींनाही घरात नेऊ लागली. मात्र ईकडे मुलीच्या आईला खुपच मोठा धक्का बसला होता. आपली ईंजिनियरिंग कॉलेजच्या पहिल्या वर्षाला असलेली पोर, मॅच बघायला म्हणून मैत्रीणीच्या रूमवर जाते काय, आणि मॅच संपल्यावरही पाच तासांनी अश्या अवस्थेत परतते काय, हे सगळं त्या बाईच्या विचारशक्तीच्या पलिकडलं होतं.

"दारू प्यायलीस? दारू?!" तीच्या तोंडून शब्दही फुटेनासे झाले होते. "डार्रू नाई मॉम... रम्म! रम्म प्यायले! वि वॉन बेबी!! ईंडिया!!!" मुलगी तर बेभानच झाली होती. तीचं हे रूप तीच्या आईने स्वप्नातदेखील कल्पीलेलं नसावं. शेवटी भाडेकरूंनी दोघींनाही घरात नेलं आणि वाद तेवढ्यापूरता मिटला. नंतर भाडेकरूंच्या घरातले लाईटस बंद झाले. मुलगी पण झिंग येऊन झोपली असावी. आई मात्र गॅलरीतच उभी होती. कदाचित रात्रभर. मग मी देखील खिडकी बंद करून घेतली.

रवीवारी सकाळी मला जाग आली तीच नेमकी माय-लेकींच्या भांडणाने! रात्री तमाशा करणारी लेक असली, तरी सकाळी (ती शुद्धीवर आल्यावर) आईने तीला फैलावर घेतलं असांवं. घराण्याची ईज्जत, माझी ईज्जत, वडिलांचं नाव, सोसायटीत, समाजात छी थू, ईत्यादी विषय बोलून झाले. ती आपली 'सॉरी मम्मी, सॉरी मम्मी' म्हणत होती. शेवटी रागाचा कडेलोट होउन आईने देव्हार्र्यासमोर डोकं आपटून घेतलं. मुलीने आणि वेळेवर घरात आलेल्या शेजार्र्यानी तीला थांबवलं नसतं तर काहीही घडू शकलं असतं. मात्र त्यानंतर सगळं शांत झालं.

सोमवारी गुढीपाडवा होता. मी पहाटे उठून प्यायचं पाणी भरत होतो. काही लोक 'पाडवा पहाट' वगैरे सारखे कार्यक्रम ऐकायला निघालेले दिसले. जरिकाठीच्या साड्या घातलेल्या काही मुलीही होत्या. आश्चर्य वाटलं. या मुलींमध्ये ती देखील होती. नउवारी साडी नेसलेली. गजरा, नथ, बांगड्या घालून अगदी छानसं गंध लावून. घरामागच्याच मैदानातच 'पाडवा पहाट' होती. औत्सुक्यापोटी तीथे गेलो. हो. तीच होती. व्यासपिठावर बसली होती. "आणि आता आपल्यासमोर गीत सादर करत आहे -- अमुक तमुक! (नाव नको लिहायला) -- " घोषणा झाली. तीने गाणं सुरू केलं. "गगन सदन, तेजोमय! तीमिर हरून करूणाकर! दे प्रकाश देइ अभय!" खुप सुरात म्हटलं. टाळ्या पडल्या. एक काका आपल्या पत्नीला हळूच म्हणाले "मुलगी किती घरंदाज आहे! सोज्ज्वळ आहे!" -- "सुंदरही आहे! अगदि साजेशी आहे अवीला!": काकुंनी सरळ मुद्यालाच हात घातला. दोघेही सुचक हसले. नंतरही बरिच गाणी झाली. तीनेही चार-पाच गाणी म्हटली. एकापेक्षा एक सुरात!

तशी ती सुरातच गाते. घरात दिवसभर गातच तर असते काही ना काही. मला ऐकू येतं. तीच्या आईला या गोष्टीचा अभिमान आहे. मुलगी छान गाते म्हणून. तीच्याबरोबर तिची आईपण एखादी ओळ म्हणून पाहते. तीचा कुठे गाण्याचा कार्यक्रम असला, की आई आवर्जुन जाते. आज मात्र तिची आई घरी होती. डोक्याला खुप जखम झाली होती. पट्टी बांधून कार्यक्रमाला गेलो, तर लोकांनी विचारलं असतं -- "काय हो काय झालं??" "हे असं कसं लागलं?!" -- मग काय सांगितलं असतं?

मध्यमवर्गिय घरातील एक मुलगी. आपली संस्कृती, आपलं संगित हे लहानपणापासून मनावर रूजवलेलं! पण कॉलेजच्या पहिल्याच वर्षाला गेल्यावर एकदम रम पिऊन तमाशा करण्याची लहर आणि हिम्मत कशीकाय होते? ती खरी कोणती? शनिवारी रात्री दोन वाजताची की सोमवारी सकाळी साडेसहावाजताची? "मी रम्म प्यायल्लीय!!" असं आईला ओरडून सांगणारी, की "दे प्रकाश देई अभय" ही ओळ सुरात म्हणणारी? आपल्या थ्री फोर्थ जिन्स आणि तोकड्या टिशर्टचंही भान नसलेली की नऊवारी साडित नथ सांभाळत गाण्याच्या कार्यक्रमाला जाणारी? ती रात्री दोन वाजेपर्यंत मित्र-मैत्रीणींबरोबर मद्यधुंद सेलिब्रेशन करणारी की घरंदाज, सोज्ज्वळ आणि अवीला साजेशी असणारी?

ती नक्की कोण?

23.2.11

आर्ट ऑफ लिव्हिंग!!

श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हींग तर्फे आयोजीत केलेल्या लयतरंग नावाच्या संगितसंध्येला गेलो होतो. जगात या आधी कधीच झाला नाही असा हा कार्यक्रम होता. तीन हजार कलावंत (२००० गायक, ५०० वादक, आणि ५०० नर्तक) एकाच वेळी, एकाच रंगमंचावर आपल्या कलेचे सादरिकरण करणार होते. बरं यापैकी कोणीच सोमेगोमे लोक नव्हते. सर्व गायक व वादकांना संगित विषारद किंवा संगितामध्ये पदविपर्यंतचे शिक्षण घेतलेले असणे ही कार्यक्रमात भाग घेण्याआधीची महत्त्वाची अट होती. तीन हजार कलावंतांसाठी ४८,००० चौरस फुटाचा महाकाय रंगमंच तयार करण्यात आला होता. नागपूरचे रेशिमबाग मैदान या कार्यक्रमासाठी सज्ज करण्यात आले होते. जवळपास एक लाख लोक या कार्यक्रमाला येतील, अशी आयोजकांची अपेक्षा होती. त्यामुळे त्या प्रमाणात बैठक व्यवस्था, पार्किंगची सोय वगैरे जवळपास करण्यात आली होती. पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणावर लावण्यात आला होता. ई-एस-एम-एस या खासगी कंपनिचे सेक्युरीटी गार्डसही जागोजागी तैनात करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी व्हिव्हिआयपी, व्ही आयपी, विषेश निमंत्रीत, निमंत्रीत, तसेच तिकिट काढून आलेले लोक आणि फुकट येणारे लोक, या सगळ्यांची योग्य व्यवस्था व्हावी अशी योजना करण्यात आली होती. प्रचंड गर्दी झाली.

सायंकाळी सहाचा कार्यक्रम साडेसात वाजता सुरू झाला, तरीही लोकांचे येणे सुरूच होते. अनेकांना -निमंत्रणपत्राअभावी प्रवेश पासनाकारण्यात आला, तर अनेकांना या ना त्या कारणास्तव दरवाज्यावरच ताटकळत उभे रहावे लागले. हा ऐतिहासिक सोहळा याचि देही याची डोळा पाहण्यासाठी म्हणून अक्षरशः लाखभर लोक रेशिमबागच्या मैदानावर जमले.

श्री श्रींचं रंगमंचावर आगमन झालं, तेच मुळी आनंदाने धावत पळत. त्यांनी येताच सगळ्यांना हात दाखवून अभिवादन केलं, आणि सगळ्या कलावंतांमध्ये उत्साह, जोश संचारला. "आज तो सुरो का तरंग नही, सुरो का तुफान आयेगा! वाह! अच्छा है! शुरू करो!" असे आशिर्वाद देऊन त्यांनी कार्यक्रमाला सुरूवात करायला सांगितली. गणेश वंदना सुरू झाली. दोन हजार गायकांचा एक आवाज, पाचशे वादकांचा एक सुर, आणि पाचशे नर्तकांचा एक ताल हे खरोखरच विलोभनिय दृष्य़ होते. नजरेच्या एका टप्प्यात संपुर्ण रंगमंच येणं अशक्यच होतं. एका कॅमॅर्र्याने हा महा-कार्यक्रम टिपणंही अशक्य होतं. म्हणुनच जवळपास पंचविसेक कॅमेराज हा ऐतिहासिक क्षण चित्रीत करत होते. एकाच वेळी दिडशे देशांमध्ये कार्यक्रमाचं जिवंत प्रक्षेपण सुरू होतं. सगळंकाही एकंदर भव्यदिव्य आणि देदिप्यमान! लाखभर लोक हजर होते. रंगमंचामध्ये आणि प्रेक्षकांमध्ये कमीत कमी दोनशे फुटाचं अंतर होतं. त्यातल्या त्यात रंगमंचावर तीन हजार लोक! शिवाय श्री श्री! तरिही लोक तल्लीन होउन कार्यक्रम ऐकत होते. हो. ऐकत होते असंच म्हणावं लागेल्, कारण दिसत तर काहीच नव्हते. एक तर दर्शकदिर्घेच्या ठीक समोर व्हीडिओकॅमेरे आणि माध्यमांच्या प्रतिनिधींची सोय केली होती. शिवाय रंगमंच्यावर रोषणाई करणारे लाईटमॅनही नेमकेच समोर उभे होते. कार्यक्रमाचं भव्यदिव्य स्वरूप पाहू जाता हे सगळं तर होणारच होतं. लोकही हे समजले होते. मिळेल त्या ठीकाणी जागा बनवत लोक बसले होते.

काही लोक आयोजकांवरती तोंडसुख घेत होते -- "पार्कींगची व्यवस्था किती दूर आहे! पाई यावं लागलं!"; "आलो, तर पास दाखवल्याशिवाय प्रवेश नव्हता! आम्हाला ताटकळत उभं रहावं लागलं!"; "प्रवेश मिळाला, तर बसायला जागा नाही! कुठे बसु? खाली? खुर्च्यावर तर पावसाचं पाणी जमा झालंय!"; "जागा मिळाली. पण दिसत नाही ना काहिच्! काय हे? साईडस्क्रीन तर लावायला हव्या होत्यात?"; -- प्रत्येकाची काही ना काही अडचण होती. सहज म्हणुन एका काकांना प्रश्न विचारला, "काय हो? तुम्हाला माहिती होतं ना की ईथे ईतकी गर्दी होणार आहे आणि गर्दिचा तुम्हाला त्रास होतो? मग कश्याला आलात ईथं?" "वा वा! ईतका मोठा कार्यक्रम! आपल्या गावात घडत आहे! मग पहायला नको!?!!" प्रतिप्रश्न फेकुन तावातावात निघून गेले. गर्दिचं, भव्यतेचं, चमकधमकीचं, आणि एकुणच रंगितपणाचं ('भपकेबाजपणाचं' हा शब्द वापरलेला श्री श्रींच्या भक्तांना कदाचित आवडणार नाही) आपल्या लोकांना कित्ती म्हणुन आकर्षण आहे!

कार्यक्रम आर्ट ऑफ लिव्हींगचा होता. जीवन जगण्याची कला शिकवणारी ही एक संस्था आहे. आध्यात्म आणि संगित यांचा संबंध जवळचा आहे, त्यामुळे हा संगितमय कार्यक्रम आयोजित केला होता. मुळात आर्ट ऑफ लिव्हींगचा मंत्र देणारे एक गुरूदेव आहेत. त्यांचे कोट्यावधी भक्त आहेत. त्यातील काही लाख नागपूरात राहतात. त्यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम घडला होता. या वर्षी नागपूरात अनेक गुरूदेव आले. मग आपलेही गुरूदेव यायला हवेत, अशी त्यांना ईच्छा होती. म्हणुन भक्तांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.

गुरुभेटीची आस प्रत्येकच शिष्याला असते, यात शंकाच नाही. असाविही. मात्र श्री श्री सारखे गुरूदेव साध्या व्हिजिटवर येत नाहीत. असा काहितरी भव्यदिव्य कार्यक्रम हवा असतो. आसारामजीबापू येतात, पण ते याच रेशिमबाग मैदानावर 'भक्त संग गुरू की होली' खेळण्यासाठी! सुधांशु महाराज येतात, ते साठ एकराच्या परिसरात उभ्या केलेल्या नारायणधाम मध्ये कथा करण्यासाठी, अगदी मुनिश्री तरूणसागरमहाराज येतात, ते देखील चातुर्मास करून भव्य सत्संग करण्यासाठी. गुरूदेव नारायणदत्त श्रीमालींची मुलेही आता गुरूदेव झाली आहेत, आणि ती देखील आपल्या गावात आणायची असतील तर भक्तगणांना मोठा समारंभ आयोजीत करावा लागतो. भव्यदिव्य काही अलौकीक असेल, तरच गुरूदेव येतात. ही खरी गुरूशिष्यांची परंपरा आहे का? की निव्वळ देखावा! "तुमचे गुरूदेव साठ हजार लोकांवर मशिनच्या पीचकारीने रंग उडवून 'होली' खेळतात का? मग आमचे गुरूदेव बघा, एक लाख लोकांशी एकत्र संवाद साधतात - संपुर्ण स्टेडिअमवर!" अशी ही अघोषित स्पर्धा तर नव्हे? साठ हजारांशी होळी खेळणारे आसारामबापू असोत, किंवा एक लाख लोकांशी एकत्र संवाद साधणारे श्री श्री रविशंकर असोत, या एक लाखांपैकी, किंवा या साठ हजारांपैकी कितींचा प्रत्यक्ष उद्धार त्यांनी केला असेल? काही मोजक्या धनदांडग्यांचा अपवाद वगळता किती लोकांशी त्यांनी वैयक्तीक संवाद साधला असेल?

छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते जागोजागी स्थापलेल्या मारूतीच्या मंदिरात येणार्र्या प्रत्येक सामान्य माणसापर्यंत सगळ्यांनी रामदासस्वामींना गुरू मानलेलं होतं. मात्र म्हणून काही त्यांनी एकत्रपणे सर्व भक्तांशी संवाद साधलेला आठवत नाही. वारकरी संप्रदाय गेल्या साडेसातशे वर्षांपासून केवळ विठुनामाच्या एका गजराच्या भरवश्यावर आणि वारकरी ध्वजाच्या खाली एकत्र येतो आहे, मात्र चंद्रभागेच्या तीरावर कुण्यातरी एका संतानेच तत्संग घेतल्याचं ऐकिवात नाही. नाथांचं किर्तन झालं की चोखोबा भजन म्हणत असंच काहीसं ऐकलेलं आहे! आणखी भुतकाळात गेलो, तर तथागत भगवान गौतमबुद्धांचा शिष्यसमुदाय खुप मोठा होता असं म्हणतात. आश्रमाची शिस्त त्यांच्यात होती. मात्र भगवान बुद्धांचे उपदेश करतांनाचे कुठलेही चित्र, अथवा लेणी पहा, त्यात ते भक्तांच्या अगदी मधोमध बसलेले आपल्याला दिसतील. दोनशे फुट दूरच्या उच्चासनावरून बोधिसत्त्वाने कधी उपदेश केला नसावा. याहिपेक्षा मागे जाऊ. वैदिक काळात गुरुगृहं म्हणजे विद्यापिठं होती. भर अरण्यात वसलेले ऋषिमुनिंचे आश्रम हे अडल्यानडलेल्यांचे आधार होते. आज या हाय प्रोफाईल गुरूदेवांपैकी कुणाच्या आश्रमात तुम्हाला सहज प्रवेश आहे? पुर्विच्या साधुसंतांचं जिवन केवळ अध्यात्मीक उपदेशच नव्हे, तर त्याहूनही अधिक बरंच काही होतं. ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांपासुन ते गाडगेबाबांपर्यंत सगळ्यांनी अन्नदानाचा संकल्प मांडला, तो आजतागायत सुरू आहे. 'गुरूदेव' स्टाईलचे संत तीन तीन हजार रूपये शुल्क आकारून कोर्सस कंडक्ट करतात, किंवा आयुर्वेदिक औषधी कमी दरात, शालेय साहित्य कमी दरात देऊन समाजाचं शतकोट्यावधींचं देणं लक्षावधींमध्ये फेडू पाहतात. यातून सत्संगात नाचणारे मल्टीमिलॅनिअर जमा होत आहेत, पण त्याच रेशिमबाग मैदानावर रात्री झोपणारा भिकारी मात्र या कार्यक्रमाच्य आयोजनापूरता तीथून हाकलून देण्यात आला आहे. तो परत येइल, तेव्हा तीथेच झोपेल. त्याचं आयुष्य बदलणार नाही. अनेक गुरुदेवांच्या आश्रमांनी गावे दत्तक घेतली. त्या गावात सुविधा पुरवल्या. अनेक ट्र्स्ट दवाखाने चालवतात. फुकट शस्त्रक्रीया करतात. पण या विधायक कार्यांवर कमी आणि गर्दी जमवणार्र्या कार्यांवर या संस्थांचा जास्त भर का म्हणुन असावा ते कळत नाही.

उपदेश त्यांनीही केला. उपदेश दे देखील करत आहेत. त्यांनी देखील चार चांगल्याच गोष्टी सांगितल्या, हे देखील चार चांगल्याच गोष्टी सांगत आहेत. गर्दि खेचून आणल्यावर त्या गर्दिच्या कानावर चार चांगलेच शब्द पडत आहेत, हे शंभर टक्के सत्य आहे. पण मुळ आत्मोन्नतीच्या उद्देशाला शेकडो योजने मागे सोडून केवळ गर्दी जमा करून भव्यदिव्यतेचा आविष्कार घडवून आणण्यात कुठले शौर्य आहे हे कळायला मार्ग नाही!

शेवटी मार्ग दाखवणारे हजार. आपला मार्ग आपल्यालाच शोधायचा आहे, हेच उमगलं.

15.1.11

शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांना ऐकल्यावर...

मकरसंक्रंतीच्या शुभमुहुर्तावर शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरेंना ऐकायला मिळावं हे केवढं मोठं भाग्य! 'राजा शिवछत्रपती' नव्याने वाचायला घेतलं आहे, आणि सुरवातीलाच प्रत्यक्ष शिवशाहिरांचं दर्शन व्हावं हा मणीकांचन योगच नव्हे का! पत्रकारीतेच्या नोकरीमध्ये आजच्यासारखा योग जुळून आला की करतोय त्या धडपडीचं सोनं होतंय अशी खात्री पटते. निमित्त होतं एका पुस्तकाच्या प्रकाशनाचं. प्रा. विष्णु घनश्याम देशपांडे. उर्फ ‘महाराज’ यांच्या कार्याचा गौरव करणारा एक ग्रंथ 'तेजाळल्या स्नेहज्योती' हा त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नागपूरच्या श्री मंगेश प्रकाशन ने प्रकाशित केला. विघची सुन डॉ. सौ रंजना ह्यांनीच हा ग्रंथ लिहलाय. लिहलाय म्हणण्यापेक्षा संपादित केलाय असं म्हणणं जास्त योग्य राहिल, कारण यात अनेकांचे 'महाराजां'च्या सहवासातले अनुभव आहेत, अनेकांच्या आठवणी आहेत, प्रत्यक्ष महाराजांची भाषणं आहेत. आणि बरंच काही. हिंदू महासभेचे नेते, शिवाय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म – नव्हे -- भारतीय संस्कृती, आणि भारतीय राष्ट्रवादाचा पुरस्कार करणारे एक अभ्यासु नेतृत्त्व ‘महाराजां’नी देशाला दिले. त्यामुळे त्यांच्यावरील गौरवग्रंथाच्या प्रकाशनाला बाबासाहेब पुरंदरेंसारखा तपस्वी आवर्जुन उपस्थीत राहिला.

तो काळच वेगळा होता असं म्हणावं लागेल. नागपूरचा, त्याहीपेक्षा मंगळवेढा नावाच्या एका छोट्याश्या गावात राहणारा एक माणूस देशपातळीवर नेतृत्त्व करतो, विदिशा, गुणा, ग्वाल्हेरसारख्या नागपूरपासून कोसो दूर असलेल्या मतदारसंघातून लोकसभेच्या निवडणूका लढवतो, आणि निवडूनही येतो, हे सगळं आजच्या काळात अविश्वसनियच. मुळात महाराज अर्थात विष्णू घनश्याम देशपांडे हे नाव मला देखील या आधी माहिती नव्हतं. मुळचे नागपूरचे असलेले देशपांडे गुणा येथून पाच वर्षे खासदार होते, त्यानंतर पदविधर मतदारसंघातून महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेवर निवडून गेले वगैरे माहिती आजच मिळाली. मुळात कधी ही माहिती मिळवण्याचा प्रयत्नही केला नाही, आणि कुणी सांगण्याची तसदीही घेतली नव्हती. मात्र आज या माणसाचं कतृत्त्व ऐकलं, आणि आपलंही आडणाव देशपांडे असल्याचा अभिमान वाटला. पुस्तक अजुन वाचलेलं नाही, वाचीन तेव्हा त्यावर लिहीन. तुर्तास आजच्या प्रकाशनसमारंभाबद्दल...

बाबासाहेब पुरंदरेंच्यां हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं. सोबत प्रमुख वक्ते म्हणून हभप चारूदत्त आफळे होते तर कार्यक्रमाचं अध्यक्षपद भुषवलं होतं ते विक्रम सावरकर यांनी. तीघांना ऐकण्यासाठी ईतके लोक आले होते, की कधी नव्हे ते सायंटीफीक सोसायटीच्या हॉलमध्ये 'उभे राहून' लोकांनी ही भाषणं ऐकली. बाबासाहेब पुरंदरेंना ऐकण्याची उत्सुकता नक्कीच जास्त होती. सार्थ होती. स्वरवाहिनी अर्थात व्होकल कॉर्डवर ताण देऊ नका, अन्यथा ती फुटूही शकते, असा सल्ला डॉक्टरांनी दिल्यानंतरही बाबासाहेब पुरंदरे बोलले. भरभरून बोलले. मनापासून.

त्यांच्याआधी बोललेल्या चारूदत्त आफळे गुरूजींनी आपल्या प्रमुख भाषणातून महाराजांच्या अनेक आठवणी सांगीतल्या आणि या व्यक्तीमत्त्वाची ओळख करून दिली. 'एक किर्तनकार या नात्याने या राष्ट्रपुरूषाचं आख्यान मी आपल्यापुढे मांडलं" असं नम्रपणे नमुद करतांनाच आफळे गुरूजींनी आज हिंदुस्तानातच हिंदू समाज कुचंबणा का सहन करतोय, याचं सुरेख विवेचनही केलं. "धर्मांतरणं होतात, यात ख्रिश्चन मिशनर्र्यांचा धूर्तपणा हे जितकं महत्त्वाचं कारण आहे, तीतकंच महत्त्वाचं कारण आहे हिंदू धर्मगुरूंची धर्मकार्यामार्फत केल्या जाणार्र्या समाजकार्याप्रती अनास्था! चर्चकडे पैसा आहे, आणि ते कोट्यावधी डॉलर्स भारतातील गरीब आदिवासिंच्या धर्मांतरणासाठी खर्च करतात. पण आपली श्रीक्षेत्रेही काही कमी श्रीमंत नाहीत. पैसा आपल्याकडेही आहे. आई तुळजाभवानीला नवरात्रीच्या नऊ दिवसांत दहा हजार साड्या आल्या, असं तुळजापूर संस्थानच मोठ्या अभिमानाने जाहिर करतं. मग या दहा हजार साड्यांपैकी पाच-पन्नास मेळघाटातल्या आदिवासिंसाठी का नाही पाठवत? लोक सदगुरू साईबाबांना बत्तीस कोटींचं सुवर्णासन देतात, पण चार पाच लाख रूपये आश्रमशाळा चालवणार्र्या हिंदू सेवाभावी संस्थांना का देत नाहीत? तिरूपती देवस्थानाचे खांबही सोन्याचा मुलामा चढवून ठेवलेले आहेत. तरीही भक्त तीथे सुवर्ण दान देतात. द्यावं. भक्ती आहे, भावना आहेत. मात्र एक कोटीचं सोनं देवाला देऊन झाल्यावर निदान एक लाख रूपये तर हिंदू समाजाच्या उत्थानासाठी खर्च करायला हवे की नको? मात्र आपले धर्मगुरू -- शंकराचार्य -- या बाबतीत उदासिन आहेत. त्यांनी सुचवलं, की देवावर खर्च करता, तसाच समाजावरही करा, तर नक्कीच देणारे हात वाढतील, आणि हिंदू सेवाभावी संस्थांचंही बळ वाढेल. धर्मांतरणाला रोखता येइल!" असा विचार आफळेबुवांनी मांडला. आपल्या ओघवत्या शैलीत त्यांनी बौद्धीक सुमारिकरणाचा विषयही मांडला. "ज्ञान तर दूरची गोष्ट, हल्ली माहितीही नसते, आणि ती मिळवण्याचा प्रयत्नही नसतो." भारत देशाच्या हजारो वर्षाच्या देदिप्यमान ईतीहासाप्रती आपल्या मनात असलेली अनास्था आपल्याला घेऊन बुडणार की काय ईतकी भयंकर वाढलेली आहे. एक तर खरा ईतीहास मोडीत काढून खोटा ईतीहास सांगणं सुरू आहे. एनसिईआरटी पासून ते सीआयईटी पर्यंत सगळ्यांनी हिंदूराष्ट्र असलेल्या भारताच्या ईतीहासातून हिंदुत्त्वच मिटवण्याची शपथ घेतली आहे. अश्या या वाळवंटात खरा ईतीहास सांगणारी हिरवळ असं हे पुस्तक असल्याचं आफळेबुवांनी सांगीतलं.

आफळेबुवांच्या भाषणातीलच मुद्दा उचलत बाबासाहेब पुरंदरेंनी बोलायला सुरूवात केली ती 'सा मां पातू सरस्वती भगवती!' या ओळीने. "सध्या देशापुढे तीन बिकट समस्या उभ्या आहेत -- जातीयवाद, चंगळवाद आणि दहशतवाद. आणि या सगळ्यांना पोषक ठरत आहे ते म्हणजे अज्ञान! आपण अज्ञान जपतो, आणि म्हणूनच चंगळवादाकडे वळतो. आपल्यात धर्माबद्दल अभिमान कमी आणि जातींबद्दल अढीच जास्त आहे. परकियांकडून सहाय्य घेऊन दहशतवाद आता आपल्या घरापर्यंत पोचलाय आणि आपण महासत्ता बनण्याची स्वप्न बघत झोपा काढतोय. आपण शिवाजी महाराज वाचतो, सुभाषचंद्र बोस वाचतो, सावरकर वाचतो आणि म्हणतो की वा! काय देशभक्ती! केवढा त्याग! किती शौर्य! केवढी हिम्मत! आणि पुस्तक बाजूला ठेवून देतो. आपण स्वतःमध्ये कधी आणणार हे सगळे गुण किंचीत तरी? आपण कधी करणार थोडीतरी हिम्मत? आपण कधी दाखवणार जरासं धैर्य?" बाबासाहेब पुरंदरे बोलत होते. लोक विलक्षण एकाग्रतेने ऐकत होते. "समर्थ रामदास स्वामी रोज बाराशे सुर्यनमस्कार घालायचे. आपण बाराही घालत नाही! मग मनाचे श्लोक वाचून काय फायदा?"

"हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू म्हणजे श्री शंकराचार्य! यांच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे, त्या पदावर, त्या आसनावर माझी नितांत श्रद्धा आहे. मात्र शंकराचार्यांप्रती मला एक तक्रार आहे. ज्या वेळी शिवाजीमहाराजांना राज्याभिषेक होणार होता, तेव्हा तब्बल साडेतीनशे वर्षानंतर एक हिंदू राज्य जन्म घेतंय या नितांत आनंदाने दिपून जाऊन पाचही पिठाच्या शंकराचार्यांनी दोन्ही हात वर करून महाराजांना आशिर्वाद द्यायला हवे होते. मात्र एकाही शंकराचार्याने येऊ नये, ही केवढी अनास्था!" शिवाजी महाराजांबद्दल बोलतांना बाबासाहेबांमध्ये विलक्षण शौर्य संचारतं, शक्ती येते, याचा प्रत्यय आज आला. "राजा... राजा!! अरे शेकडो वर्षांच्या अंधारानंतर आशेचा पहिला किरण तुझ्या रूपाने उगवतोय, तुला आमचा आशिर्वाद असो!" असं एक पत्रही एकाही पिठाधीशाकडून येऊ नये, हे किती दुर्दैव?!" ते भारावून बोलत होते.

मला वैदिक काळातील ऋषिमुनिंची आठवण झाली. किती मोठा वचक, केवढी अधीसत्ता होती त्यांची भारतीय राजसत्तेवर! कोणीही मुनिवर, महर्षी कुठल्याही राजाच्या दरबाही कधीही येऊन धडकत असे. राजा महर्षींची पाद्यपुजा करी, आणि बसायला आपलं सिंहासनच त्यांना देई! ते मागतील ती गोष्ट राजा डोळे झाकून दान करत असे. मग विश्वामित्रांनी मागितलेलं प्रत्यक्ष जेष्ट पुत्राचं दानही दशरथासारखा चक्रवर्ती सम्राट नकारू शकत नव्हता, आणि स्वप्नात मागितलेल्या राजपाटाच्या दानाचाही विसर राजा हरिश्चंद्राला पडू शकत नव्हता. मात्र शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या वेळीपासूनच उदासिन होत चाललेली ही धर्मसत्ता आता तर पारच कमकूवत झालेली आहे. कांची-कामकोटीच्या शंकराचार्यांना अटक होउनही कुणालाच काही वाटत नाही, आणि ओरीसात स्वामी लक्ष्मणानंदांच्या हत्येनंतरही देशभर शांती राहते. मुळात याचं कारण म्हणजे 'अज्ञान!'

बाबासाहेब पुरंदरेंही याच विषयावर भरभरून बोलले. आपल्यापैकी अनेकांना अरूणाचल प्रदेशची राजधानी कुठली हे देखील माहिती नाही. आणि अरूणाचल प्रदेशवर चिन आपला हक्क सांगतोय, हे तर आपल्या गावीही नसतं. आपण भारत देशाचा विचार करतच नाही. आपल्या स्वतःचा, खुपच खुप आपल्या जातीचा, फारफार तर आपल्या राज्याचा विचार करतो. भारत या राष्ट्राचा विचार आपण का करत नाही? 'आपल्याला काय त्याचं!' हे परवलीचं वाक्यच आपल्याला घेऊन बुडणार की काय! वेळीच सावध व्हायला पाहिजे, बाबासाहेब सांगत होते...

मागे डॉक्टर राममनोहर लोहियांच 'सगुण और निर्गुण' हे पुस्तक वाचण्यात आलं. डॉ लोहीया उत्तरप्रदेशातल्या फैजाबादचे. आणि या माणसाने गोवा मुक्तीच्या आंदोलनाचं नेतृत्त्व केलं! कुठे उत्तरप्रदेश, कुठे गोवा! पण तो भारत या माझ्या देशाचा भाग आहे, तो भाग माझ्या देशात आला पाहिजे ही आस्था त्यांच्या ठायी होती. म्हणून देशभरातून सत्याग्रहिंच्या, आंदोलंकांच्या तुकड्या गोव्यात आल्या, आणि गोवा स्वतंत्र झाला. परमपुजनिय गोळवलकर गुरूजींचंही तसंच. ते देशभर असे फीरत जसे काही या भावाकडून त्या भावाच्या घरी पाहूणचाराला जातो आहोत. गांधीजीसुद्धा साबरमती वरून सेवाग्रामला आले. कुठून कुठे स्थायिक झाले. स्वामी विवेकानंद कलकत्त्यावरून कन्याकुमारीला गेले. या लोकांना सगळा भारत देशच आपला वाटायचा. म्हणून भारत देशासाठी या लोकांनी काहीतरी केलं. आपल्याला आपलं घर, आपला मोहोल्ल्या, आपली जात, आणि आपलं राज्य यांच्यातून वेळ मिळेल तर आपण संपुर्ण देशाचा विचार करू ना! धूर्त राजकारण्यांसाठी हे बरंच आहे. लोक जीतके कमी विचार करतील तीतकं त्यांना मेंढरासारखं हाकता येइल. माहितीच नसेल तर विचारच करणार नाहीत. म्हणून मग माहितीच देत नाहीत. अभ्यासक्रम ठरवतात, पण त्यातून चुकीचा ईतीहास शिकवतात. ईंग्रजांनी, मोगलांच्या बखरकारांनी -- म्हणजेच आपल्या शत्रुंनी लिहलेला ईतीहास आपण आज अभ्यासतो. आणि बाबासाहेब पुरंदरेंनी लिहलेला खरा ईतीहास आपल्यातलेच, शिवरायांचेच वंशज असलेले 'मराठा सेवा संघ' खोटा ठरवायला निघालेत.

ईतीहासाची कास धरून ठेवली तरच भविष्याचा वेध घेता येइल. आपण सगळ्यांनी खरा खरा ईतीहास अभ्यासायला पाहिजे. संपुर्ण भारत देशाचा ईतीहास. खर्र्याचा शोध घेऊन माहिती करून घेतली पाहिजे. मी तर प्रयत्न करणार आहे. विष्णू घनश्याम देशपांडे यांच्याप्रमाणे विचार आणि कर्तृत्त्वही करण्याचं सामर्थ्य अंगी यावं, यासाठी बळ देण्याची विनंती ईश्वराकडे करणार्र्या बाबासाहेब पुरंदरेंच्या पायावरती डोकं ठेवून त्यांच्या प्रार्थनेला बळ यावं अशी करूणा मी भाकणार आहे.